मातोश्रीवर जाऊन दुध का दुध, पाणी का पाणी करणार
शिवेसना सावेडी विभाग प्रमुख काका शेळकेंचा पलटवार
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वीकृत सदस्य निवडीवरुन काका शेळके यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर शहर शिवसेनेतील दोन गटांमधील संघर्ष उफाळून आला आहे. आधी गटनेते संजय शेंडगे यांनी शेळके यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर नगरसेवक गणेश कवडे यांनीही शेळकेंचा मराठा समाजाला विरोध असल्याचा आरोप करत शहरप्रमुख बदलण्याची मागणीही केली आहे. त्याला शेळके यांनी प्रत्युत्तर देतांना दुसर्या गटावर पलटवार करत लवकरच मातोश्रीवर जावुन दुध का दुध पाणी का पाणी करणार असल्याचे म्हटले आहे.
शिवसेनेचे गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेतली म्हणजे जातीयवाद कसा होतो? असा सवाल करत सकाळी बुर्हाणनगर, दुपारी सारसनगर आणि संध्याकाळी चितळेरोड, हे मी कधीच केलं नाही, ज्यांनी केले त्यांनीच आत्मपरीक्षण करावे, असेही शेळके यांनी म्हटले आहे. शिवसेनेतील यांच्या वादामुळे स्व. अनिल भैय्यांना दोनवेळा पराभव पत्करावा लागला. भैय्यांनीच यांचे सर्व पुरावे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना दिलेले आहेत. असे सांगुन शेळके म्हणाले की, संपर्कप्रमुख बदलण्याची मागणी मी केली होती. मात्र, आता शहर प्रमुखांच्या बदलाची मागणी करत चोराच्याच उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. स्व.अनिल भैय्यांना सावेडी उपनगर परिसरातून अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे पक्ष संघटेनेसाठी मी काय काम केले हे विचारणार्यांनी आधी स्वतःच्या प्रभागातून स्व.भैय्यांना किती मते मिळाली होती, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करावे. सर्व समाजाला न्याय मिळावा, एवढीच भूमिका मी घेतली. यात मी मराठा समाजाला विरोध केला, असे सांगत लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू झाले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज यांना माननारा स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. ज्यांना आज संपर्क प्रमुखांचा कळवळा आला आहे, त्याच संपर्कप्रमुखांना स्वतःच्या स्वार्थासाठी शिवालयात धक्का-बुक्की कुणी केली? त्यांनी गाडी कुणी फोडली होती? हे सर्वांनाच माहिती असल्याचा टोलाही त्यांनी कवडे यांचे नाव न घेता लगावला. स्व. भैय्यांच्या पराभवानंतर संपर्कप्रमुख शिवालयात किती वेळा आले? किती बैठका घेतल्या. स्व.भैया गेल्यानंतर यांच्या सगळ्या बैठका दुसर्याच पक्षाच्या कार्यालयात होत असतात, असा आरोपही काका शेळके यांनी केला आहे. शहरात आजपर्यंत शिवसेनेचे सर्व कार्य स्व.भैय्यांच्या शिवालयातूनच चालायचे. मग आता शहरात दोन संपर्क कार्यालये कशासाठी? याचे स्पष्टीकरण संपर्कप्रमुखांनीच द्यावे. याबाबत सर्व पुरावे घेऊन लवकरच ‘मातोश्री’वर जाणार आहोत. तिथेच ‘दूध का दूध-पाणी का पाणी’ होईल, असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment