शहरातील प्राणी मित्रांना एकत्रित करून ‘वाघ्या फाऊंडेशन’ची स्थापना
प्राण्यांना संरक्षण देण्यासाठी संस्था काम करणार - सुमित वर्मा
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लॉकडाऊनच्या काळात सर्व जण माणसांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी धडपडत होते; तेव्हा मुक्या प्राण्यांसाठी सुद्धा काही करायला हवं हा विचार डोक्यात आला आणि या कामाची सुरुवात म्हणून शहरातील सर्व प्राणी मित्रांना एकत्र करून ‘वाघ्या फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ, औषधोपचार, शस्त्रक्रिया संदर्भात काम करण्यात येणार आहे. यासाठी सर्व गोष्टी सेवाभावी असणार असून त्यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार नसणार. त्याचप्रमाणे प्राण्यांना संरक्षण देण्यासाठी देखील काम या संस्थेच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिली.
यावेळी राधिका रनभोर, सायली आठरे, अमोल कनगरे, विनोद बन, शुभम शिरसाठ, किर्ती कांजवणे, दिया कोठारी, किर्ती बेलेकर, पुनम तोरडमल, अमित वाघचौरे, दर्शन काळे आदी उपस्थित होते. महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा वैद्यकीय अधिकार्यांच्या मुक्या प्राण्यांसाठी असलेल्या कामावर आता वाघ्या फाऊंडेशनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. कारण भटक्या जनावरांसाठी जे काम प्रशासनाकडून अपेक्षित आहे ते काम आजपर्यंत झालेलं नाही; म्हणून आता वाघ्या फाऊंडेशन यासाठी काम करणार असल्याचे सुमित वर्मा यांनी सांगितले. काही बौद्धिक दिवाळखोर लोकं दिवाळीमध्ये प्राण्यांच्या शेपटीवर फटाके फोडतात तर काही रंगपंचमीच्या वेळी प्राण्यांवर रंग टाकतात. यातून नाना प्रकारच्या व्याधी प्राण्यांना होतात, यावर काम करणं गरजेचं आहे. यासाठी जे प्राणी संरक्षण कायदे आहेत याची जनजागृती आणि या प्रकारच्या त्रासातून लोकांना याचे काय परिणाम भोगावे लागतील, याची जाणीव आता वाघ्या फाऊंडेशनच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संस्थेच्या कामकाजाची माहिती आणि सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करून काम सुरू करण्यात आले आहे. या संघटनेसोबत प्राणी मित्रांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी मो.9860521022 या क्रमांकावर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment