एकाच दिवसात कोरोनाचे 12 बळी; मृत्यूंची संख्या तब्बल 318 वर...
बेड देता का बेड? रुग्णांचा आक्रोश !
नगरी दवंडी/प्रतिनिधी अहमदनगर ः पत्रकार पांडुरंग रायकर यांचा पुण्यात कोरोना उपचाराअभावी मृत्यू झाला. कोपरगाव मधून पुण्यात जाण्यापुर्वी नगरमधील रूग्णालयात रायकर यांच्या नातेवाईकांनी दाखल करण्याचा प्रयत्न केला. बेड देता का बेड म्हणून आक्रोश केला, पण लाखोंची बिले काढणारी ही खाजगी रुग्णालये डिपॉझिट भरा म्हणून आग्रह करू लागली व म्हणून त्यांना पुण्यात जाणे भाग पडले व त्यात उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोनाकहर अधिकाधिक भयावह स्वरूप धारण करताना दिसत आहे. आज अशी अवस्था आहे की, कोरोनामुळे कमी आणि केवळ वेळेत बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आवश्यक ते उपचार न मिळाल्याने जादा रुग्ण दगावत आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांना ‘कुणी बेड देता का बेड’, असा आक्रोश करीत हॉस्पिटलांच्या पायर्या झिजवाव्या लागत आहेत. कोरोनाला आळा घालण्यात शासकीय यंत्रणा स्पेशल नापास झाली आहे.
जिल्ह्यातील प्रशासन या निमित्ताने दररोज केवळ नव्या घोषणा करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे आधीच भयभीत झालेली जनता आता हताश होवून गेलेली दिसत आहे. जनतेचा हा आक्रोश शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कानावर पडत नाही, हे जिल्ह्यातील जनतेचे दुर्दैव म्हणायला हवे.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतासह जगभरात कोरोना कहर माजवेल, रुग्णसंख्या कमालीची पातळी गाठेल, अशी आशंका जागतिक आरोग्य संघटनेसह देशातील आणि राज्यातील विविध यंत्रणांनी दोन-तीन महिन्यापूर्वीच वर्तविलेली होती. म्हणजे कोरोनाच्या या झंझावाताची जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला पूर्वकल्पना नव्हती, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे आज अपुरी पडत असलेली वैद्यकीय यंत्रणा हा केवळ प्रशासनाच्या वेळकाढूपणाचा परिपाक आहे, असे म्हणायला हरकत नाही. जुलै अखेर जिल्ह्यात रुग्ण संख्या अतिशय कमी होती. त्याचवेळी जर खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने आणि प्रशासनाने वैद्यकीय यंत्रणा आणखी सुसज्ज आणि सक्षम केली असती तर आजच्यासारखी वेळ आली नसती. आज घडीला जिल्ह्यात22 हजारांच्या पुढे कोरोनाग्रस्त आहेत. त्या तुलनेत जिल्ह्यात एक तृतीयांशसुध्दा बेड नाहीत. त्यामुळे अनेक रुग्ण घरीचं होम क्वारंटार्ठन होत आहेत.घरी क्वारंटाईन करण्यात आलेल्या या रुग्णांमुळेच जिल्ह्यात कोरोनाचा आणखी फैलाव होण्याला चालना मिळण्याची शक्यता आहे. कुठे ऑक्सिजन नाही तर कुठे व्हेंटिलेटरचा पत्ता नाही, कुठे आवश्यक सोयीसुविधा नाहीत तर कुठे डॉक्टरांचाच थांगपत्ता नाही, असा सगळा भोंगळ कारभार सुरू आहे. आज रुग्णांना रुग्णवाहिका मिळणे दुरापास्त झाले आहे, रुग्णवाहिका मिळाली तरी हॉस्पिटल मिळणे अवघड होवून बसले आहे, हॉस्पिटल मिळाले तर तिथे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा मिळेनाशी झाली आहे. या सगळ्याची गोळाबेरीज करता करता रुग्णाच्या नातेवाईकांचा दिवस-दिवस वाया जात आहे आणि या कालापव्ययामुळे अत्यवस्थ असलेले रुग्ण दगावताना दिसत आहेत. आज दिवसाला सरासरी कधी 5 तर कधी 25 ते 30 लोक कोरोनामुळे दगावत आहेत आणि त्यामध्ये वेळेत किंवा आवश्यक ते उपचार न मिळाल्याने दगावणारांची संख्याच लक्षणीय आहे.
कोरोनावाढीला आळा घालण्याच्या बाबतीत गेल्या तीन-चार महिन्यात शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर उदंड घोषणा झाल्या आहेत, पण त्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतीत सगळा ठणठणाट आहे. महापालिक ा कोरोनाच्या बाबतीत तर अतिशय निरुत्साही असल्याची दिसुन येत आहे.एक-दोन सुसज्ज हॉस्पिटल्स उभा राहिली असती. पूर्वकल्पना मिळूनसुध्दा इथल्या प्रशासनाला आवश्यक त्या वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करता येत नसतील तर ते प्रशासनाचे अपयश आहे.लॉकडाऊनमुळे कोरोनाला आळा घालण्यात सपशेल अपयश आल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनच्या अपेक्षित परिणामांपेक्षा त्याच्या विपरित परिणामांचे स्वरूपच भयावह आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे होत्याचे नव्हते होवून गेले आहे. असे असतानाही जेव्हा केव्हा कोरोनायुध्दाची चर्चा होते, तेव्हा शासनाचा, प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचाही पहिला भर लॉकडाऊनवरच येवून थांबतो. रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी मात्र फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
जिल्ह्यात आज 778 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 19 हजार 961 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.66 टक्के इतके झाले आहे.जिल्ह्यात आज 778 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 19 हजार 961 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.66 टक्के इतके झाले आहे.आज नव्याने 66 रुग्णांची भर पडली आहे. यामुळे उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 491 इतकी झाली आहे. नव्याने बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर 35, नगर ग्रामीण 2, राहुरी 5, शेवगाव 1, कोपरगाव 8, जामखेड 14, मिलिटरी हॉस्पिटल 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.सध्या जिल्ह्यात बरे झालेली रुग्ण संख्या 19 हजार 961 असून, उपचार सुरू असलेले रूग्ण 2 हजार 491 आहेत. तसेच एकूण रुग्ण संख्या 22 हजार 770 झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण रोज वाढताना दिसत आहेत. सरकारी आकडेवारी एखाद्या दिवशी कमी दिसते, तर दुसर्या दिवशी एकदम वाढलेली दिसून येते. प्राप्त अहवालानुसार आकडेवारी मिळत असली, तरी त्याची भयानकता मोठी आहे. कालच्या (ता. 2) सरकारी अहवालात आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 306 होती. ती आजच्या (ता. 3) अहवालात मृत्यूची संख्या तब्बल 318 झाली आहे. एकाच दिवसात 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारच्या वेब पोर्टलवर बहुतेक रुग्णालयांंमध्ये कोरोना रुग्णांसाठी रिकाम्या बेडची आकडेवारी जाहीर केली जाते. प्रत्यक्षात संबंधित रुग्णालयात चौकशी केली असता बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. रुग्णाची परिस्थिती पाहून रुग्ण दाखल करून घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. तसेच आगावू रक्कम 30 ते 40 हजार घेतल्याशिवाय खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णाला प्रवेश दिला जात नसून, पैसे भरण्यास टाळाटाळ झाल्यास बेड नसल्याचे सांगून वेळ मारून नेल्याच्या तक्रारी रुग्णांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे वेब पोर्टलवरील आकडेवारी व प्रत्यक्षातील रिकाम्या बेडच्या आकडेवारीत घोळ कायमच असल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment