बियाणे कंपनीच्या चुकांमुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट
नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः बियाणे कंपनीच्या चुकीमुळे अनेक शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आले यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतकर्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी व रब्बी हंगामात रानडुक्करांनी घाटमाथ्यावर ज्वारी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान केले होते. वनविभागाने शेतात येऊन पंचनामे देखील केले होते. या शेतकर्यांही ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना शेतकर्यांच्या नुकसान भरपाईचे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, शहरप्रमुख गणेश काळे, अल्पसंख्याक प्रमुख नासिर खान, शशी खटावकर, विजय पेडगावकर, संकेत पवार, विक्रांत जाधव, शरद उगले, बापु मडके, दिपक सुरसे, जयदत्त जाधव, हनुमंत मोरे, अल्लाउद्दीन शेख, महेश खैरे, सुरज काळे, रफिक कुरेशी, किरण ओझर्डे, अल्ली शेख, आवेश शेख, कैलास रसाळ, गणेश पवार, शिवकुमार डोंगरे यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या तत्त्वावर शिवसेना काम करत आहे. सत्तेत आसतानाही जर शेतकर्यांवर अन्याय होत असेल तर शिवसेना शेतकर्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहते व शेतकर्यांना न्याय मिळवून देते. शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, संपर्क प्रमुख संजय धाडी, सहसंपर्क प्रमुख डॉ विजय पाटील यांच्या आदेशाने जामखेड तालुका शिवसेना काम करत आहे. चालू वर्षी खरीप हंगामात घाटमाथ्यावर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने अनेक शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. यात बियाणे कंपनीची चूक आहे. यामुळे शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. कृषी विभागाने तक्रारदार शेतकर्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली पण अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच रब्बी हंगामात साकत, शिऊर, जातेगाव, दिघोळ, देवदैठण या परिसरात रानडुक्करांनी ज्वारी पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान केले होते. वनविभागाने शेतात जाऊन फोटो काढून पंचनामे केले होते. यात शेतकर्यांना उतारे काढणे फोटो काढणे यासाठी बराच खर्च झाला पण भरपाई काहीच नाही. सात महिने झाले तरी अद्यापही शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही तेव्हा उगवण न झालेल्या व दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या तसेच रानडुक्करांनी नुकसान केलेल्या शेतकर्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अन्यथा तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
|
No comments:
Post a Comment