बलात्कारांच्या घटनांनी देश हादरला... मुली व महिला असुरक्षित
नवी दिल्ली (प्रतिनिधी) ः हैदराबाद मधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिची जाळून हत्या केल्याच्या निषेधार्थ देशात जनक्षोभ उसळत असतानाच मुंबईतील 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियानासह इतर राज्यात 44 बलात्काराच्या घटना घडल्या असून त्यामुळे देशात मुली व महिलांचे सार्वजनिक जीवनात जगणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे. मुली व महिलांवर बलात्कार करणार्या नरामधांना भर चौकात फाशी देण्याची तरतूद असलेेला कायदा त्वरित संसदेत संमत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg1n0ts-RnyX6nBqXb7yT-yzhPAZjzEnYmqQQiS-hGpnxbsx4hDIBoRKdGwJ_2F6b5EklhVwOmenkeMFBSwS6p-5r5WOxn4QgYsM13HRe6CNMeWJv_iqSmzB347W7-H12QEfhOsXzKyKVE/s320/Untitled-1.jpg)
हैदराबादमधील घटनेच्या निषेधार्थ देशभर आंदोलने, मूक मोर्चे सुरु असतानाच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील कुर्ला परिसरात 6 वर्षाच्या बालिकेवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बिहारमध्येही बलात्कार करुन मुलीला पेटवून देण्यात आले आहे.
देशातील सर्वाधिक सुरक्षित शहरापैकी एक अशी ओळख असलेले मुंबई शहर महिला व मुलींसाठी असुरक्षित बनू लागल्याचे चित्र आहे. मुंबईत 2018 ते 2019 या वर्षात बलात्कारांच्या घटनांमध्ये 20 टक्के तर विनयभंगाच्या गुन्ह्यात 50 टक्के वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. बलात्काराच्या एकूण घटना पाहिल्या तर अत्याचार झालेल्या 70 टक्के मुली या अल्पवयीन आहेत. विशेष म्हणजे महिलांवर अत्याचार करणारे 90 टक्के ओळखीचे किंवा नात्यातील असल्याचा अहवाल न्याय वुमन ऑर्गनायझेशन चा सामाजिक संस्थेने दिला आहे.
हैदराबाद मधील बलात्काराची घटना समोर आल्याने देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झाला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलावली असून निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या शिक्षेस होत असलेल्या विलंबाचा अहवाल मागविला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यापेक्षा बलात्कारित आरोपींना भर चौकात फाशी देण्यासारखी कठोर शिक्षा देता येऊ शकते काय याची चाचपणी केली असल्याचे समजते.
No comments:
Post a Comment