छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, १७ वर्षीय तरुणाला अटक.
भिवंडी: गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. मात्र याच सोशल मीडियावर काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाला भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी अटक आहे. मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील कचेरी पाडा येथे राहणारा उदय पवार रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मध्यरात्री बारा वाजता त्यांनी रिक्षा उभी केल्यानंतर त्यांचे स्वतःच इन्स्टाग्राम पेज उघडले असता, त्यांना इन्स्टाग्राम पेजवर दिसले की, कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह कमेंट लिहून पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द लिहिले आहेत. जे पाहून उदय पवार यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी रात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु सुरवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश पाटील (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यासह हिंदू संघटनेचे लोक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तातडीने अल्पवयीन मुलाला अटक करण्याची मागणी लावून धरली.
त्यानंतर उशिरा रात्री शांतीनगर पोलिसांनी उदय पवार यांच्या तक्रारीवरून शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यां सतरा वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करून त्याला काही तासांतच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. दुसरीकडे पोलिसांनी संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment