शेतकर्यांना वाचविण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा ः करंदीकर
शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आयोजित धरणे आंदोलनाची रविवारी सांगता
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नव्याने पारीत करण्यात आलेल्या तीन नवीन कृषी कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी, हे कायदे शेतकरी विरोधी असल्याने ते त्वरीत रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्यांच्या प्रदीर्घ आंदोलनाची दखल केंद्र सरकार घेत नसल्याच्या निषेधार्थ सोमवार दि.11 जानेवारी पासून शहरातील मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सुरु करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाची सांगता सातव्या दिवशी रविवार दि.17 जानेवारी रोजी जोरदार शक्तीप्रदर्शनाने करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र करंदीकर यांनी दिली.
केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून जाणीवपूर्वक सातत्याने सर्व सामान्य जनतेच्या मुलभूत अधिकारांच्या विरोधात आणि संविधानाच्या विरोधात नवनवीन कायदे पारित करीत आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनचा फायदा घेऊन व शेतकर्यांच्या विरोधात अत्यंत घातक कायदे मंजूर करण्यात आले. हे काळे कायदे केवळ भांडवलदारांच्या फायद्याचे असून, शेतकर्यांना भांडवलदारांचे गुलाम बनविणारे आहे. सदर शेतकरी विरोधी काळे कायदे त्वरित पुर्णपणे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी संपूर्ण देशात तीव्र आंदोलन करीत आहेत. राष्ट्रीय किसान मोर्चाने शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रीय स्तरावर व्यापक जनआंदोलन सुरु केले आहे. त्या अंतर्गत संपूर्ण देशात 31 राज्यात, 550 जिल्ह्यात, जिल्हा मुख्यालय येथे दि. 11 ते 17 जानेवारी दरम्यान धरणे व प्रदर्शन आंदोलन सुरु आहे. अहमदनगर मध्ये सुरु असलेले आंदोलनाची सांगता सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटना, शेतकरी, कामगार व महिला, युवक तथा सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन बाळासाहेब मिसाळ, राजेंद्र करंदीकर, शांताराम उपाध्ये, संजय सावंत, हरजितसिंग वधवा, भगवानशास्त्री घुगे महाराज आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment