पाणी चोर तुपाशी नागरिक मात्र उपाशी !
अनाधिकृत नळ कनेक्शन त्वरित काढा, प्रभाग 2 मधील नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर - औरंगाबाद रोडवरील वसंतनगर, रेणुकानगर, तवलेनगर, अभियंता कॉलनी, सूर्यनगर, एस.टी.कॉलनी, हिंमतनगर, लक्ष्मीनगर भागात पाणीपुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीवर कमर्शियल व घरगुती नळ कनेक्शन अनाधिकृतपणे घेतल्याने प्रभाग 2 मधील उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत होत असून, बर्याच भागात पाणीच येत नाही. पाणी चोर तुपाशी व नागरिक मात्र उपाशी अशीच परिस्थिती सध्या आहे.
याबाबत नागरिकांनी प्रभाग 2 च्या नगरसेवकांना माहिती दिली असून, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार आदिंनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंता आर.जी.सातपुते यांची नागरिकांसमवेत बैठक घेऊन निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी एकनाथ खिलारी, नानासाहेब दातीर, सूर्यकांत झेंडे, वसंत सरमाने, प्रसाद कदम, प्रसाद कराळे यांनी चर्चेत भाग घेऊन लक्ष्मीनगरसह उपनगरातील पाणी प्रश्न हा मुख्य जलवाहिनीवरील अनाधिकृत नळ कनेक्शनमुळे निर्माण झाला असून, तातडीने ही कनेक्शन काढा. आठ दिवसात जर कनेक्शन काढली नाही तर रस्तारोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.
निवेदनाच्या प्रती मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह नगरसेवकांना दिल्या. अभियंता आर.जी.सातपुते यांनी याबाबत तातउीने पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. माजी नगरसेवक निखिल वारे यांनी मनपाने नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊन त्वरित दखल घ्यावी, अन्यथा नागरिकांबरोबर आम्हाला देखील तीव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल. प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणार्या लोकांना पाणी मिळालेच पाहिजे. पाणी चोरांवर कठोर कारवाई साठी मनपाने पावले उचलावी, असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment