ना.दिलीप वळसे पाटील यांच्याशी राज्यातील माथाडी पतसंस्थांबाबत चर्चा
कर्ज हफ्ते कपातीमुळे कामगारांची आर्थिक घडी बसण्यास मदत होईल!
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः माथाडी पतसंस्थाचे कर्ज, हफ्ते कपाती बाबत चर्चा होऊन माथाडी कामगारांचे पगारातून पतसंस्थांचे कर्ज हफ्ते कपात करण्यात यावेत या बाबतचे आदेशावर स्वाक्षरी करून संबंधित अधिकार्यांना लवकरात लवकर आदेश राज्यातील माथाडी कामगार मंडळांना पारीत करण्याच्या सूचना ना.दिलीप वळसे पाटील यांनी दिले. राज्यातील माथाडी कामगारांचे विविध प्रश्नाबाबत आ.संग्राम जगताप यांच्यासह कामगार मंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील यांची मुंबई येथे समक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस तथा अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. माथाडी कामगारांबाबत फडणवीस सरकारने मागील पाच वर्षामध्ये आडमुठेपणाचे निर्णय घेऊन कष्टकरी जनतेचा छळ करण्याचे पाप केले आहे. मार्च 2019 मध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याअगोदर शासन निर्णय होऊन माथाडी कामगारांचे पगारातून माथाडी पतसंस्था, बँका यांचे कर्ज हफ्ते कपात करण्याचे बंद केले या निर्णयामुळे माथाडी कामगार आर्थिक अडचणीमध्ये आला व परिणामी खाजगी सावकारांच्याकडे जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. फडणवीस सरकार भांडवलदारांचे पाठीमागे कशा प्रकारे भक्कम उभे होते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. परंतु शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी जनता यांचेशी नाळ असणारे आघाडी सरकार खा. शरदचंद्र पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थापन झाल्यानंतर खा.शरदचंद्र पवार यांनी पुण्यात डॉ. बाबा आढाव यांची समक्ष भेट घेऊन माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत संबंधित खात्यांचे मंत्री व अधिकारी यांची बैठक घेऊन माथाडी कामगारांचे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे राज्यातील माथाडी कामगार सुखावला आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत आ.संग्राम जगताप यांचे सहकार्याने सतत पाठपुरावा केल्यामुळे माथाडी पतसंस्थांचे कर्ज हफ्ते कपात करण्यासंदर्भातील निर्णय मार्गी लावल्याचे समाधान मिळाल्याचे अविनाश घुले यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment