विकासकामे महत्वाची, अस्तित्वहिन लोकांविषयी बोलण्यात अर्थ नाही ः आ. लंके
कोहकडी येथे 48 लाखाच्या विकासकामांचा शुभारंभ
नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यात माझ्यादृष्टीने विकासकामे महत्वांची असून अस्तित्व संपलेल्या लोकाविषयी बोलण्यांत अर्थ नाही, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
रविवार(दि.27)रोजी कोहकडी(ता. पारनेर)येथे ग्रामपंचायतच्या सुमारे 48 लाख रुपायांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार निलेश लंके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सुदाम पवार हे होते.
यावेळी बोलतांना आ. लंके म्हणाले, जगात कोरोना महामारीचा हाहाःकार चालू आहे. गावागावांमध्ये अनेक विकासकामांची मागणी ग्रामस्थ करत आहेत.तालुक्यातील साकळाई योजना, केके रेंज, राळेगणसिद्धी पाणीयोजना अशा अनेक योजनांच्या अनेकवेळा घोषणा होऊनसुद्धा त्या हवेत विरल्या. मात्र मी विधानसभा सदस्य झाल्याबरोबरच अनेक योजनाचा पाठपुरावा करून त्या कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न चालू केले. तालुक्यातील ज्या भागामध्ये विकासकामांची गंगा पोहचलीच नाही अशा अनेक कामांबरोबरच उर्वरित कामांचा अभ्यास पूर्ण असा मास्टर प्लॅन करून अनेक कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला. कोरोना महामारीने मात्र निधी मिळण्यास थोडा विलंब लागला. मात्र थोड्याच दिवसात तालुक्यातील सर्वच विकासकामे लवकरच चालू झालेली दिसतील. तालुक्यातील सर्व खेड्यापाडयांत वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण याचबरोबर दर्जेदार रस्त्यांची कामे करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कोहकडीचे सरपंच डॉ. साहेबराव पानगे, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, निघोजचे माजी सरपंच ठकाराम लंके, चंद्रकांत लंके, अॅड. राहुल झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अरुण पवार, जवळ्याचे उपसरपंच किसनराव रासकर, मार्केट कमिटीचे सदस्य आण्णा बढे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब मदगे, सोमनाथ वरखडे, सचिन वराळ, विक्रम कळमकर, अरुण कळमकर, बाळासाहेब खोसे, सुवर्णा धाडगे, तसेच निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment