गंधेंचा आंदोलनाचा इशारा; कै. बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीला वाली कोण? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, August 27, 2020

गंधेंचा आंदोलनाचा इशारा; कै. बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीला वाली कोण?

 गंधेंचा आंदोलनाचा इशारा; कै. बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीला वाली कोण?

आयुक्त व आरोग्याधिकार्‍यांच्या चुकीच्या धोरणामुळे रक्तपेढी बंद होण्याच्या मार्गावर?










नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेने 1984 सालापासून कै. बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीची स्थापना करुन गोरगरिब रुग्णांसाठी रक्त संकलनाचे काम सुरु करून रक्तपुरवठा करण्याचे काम केले आहे. आता रक्तपेढीमध्ये एकही डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे रक्तपेढीला वाली कुणीच नाही. परंतु  आरोग्याधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे रक्तपेढीत एकही रक्ताची बाटली तयार होत नाही. जनतेच्या पैशांचा योग्य उपयोग होत नसेल तर याला जबाबदार कोण.असा प्रश्न गंधे यांनी उपस्थित केला आहे.
  अन्न व औषध प्रशासन यांच्या नियमावलीनुसार आवश्यक कर्मचारी उपलब्ध नाही. त्यामुळे रक्तपेढीतील रक्तविघटन प्रक्रिया बंद आहे. रक्तपेढी विभागामध्ये टेक्निकल सुपरवायझर पूर्णवेळ उपलब्ध नसल्यामुळे अन्न व औषध प्रशासन यांनी रक्तविघटन प्रक्रिया पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या रक्तपेढीत डॉक्टरही नसल्यामुळे रक्तपेढीची परवानगी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आयुक्त श्रीकांत मायकलवार व आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या चुकीच्या कारभारामुळे गोरगरिब रुग्णांची रक्तपेढी बंद होऊ शकते.
आयुक्त यांना आरोग्याधिकारी यांनी अपुरी व चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. रक्तपेढीसाठी शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशीन उपलब्ध करुन दिले आहे. कोट्यावधी रूपये यावर खर्च झाले आहे.
  कै. बाळासाहेब देशपांडे रक्तपेढी लवकरात लवकर सुरु करून गोरगरिब रुग्णांना दिलासा देण्याचे काम आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी करावे, अन्याथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल, अशी निवेदनाद्वारे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र भैय्या गंधे यांनी दिली.रक्तपेढी सुरु व्हावी, यासाठी महापोर बाबासाहेब वाकळे यांनी गेल्या सात-आठ महिन्यापूर्वी आढावा बैठक घेऊन डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे सोपविण्याची मागणी केली. डॉ. राजूरकर यांनी आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारित काम न करण्याच्या अटीवर रक्तपेढीचे कामकाज पाहण्यास तयारी दर्शविली. तसेच रक्तपेढीचे कामकाज सुधारण्याकामी एक वर्षाच्या कालावधीची मागणी केल्यानंतर महापौर वाकळे यांनी काम करण्याचे त्यांना आदेश दिले. परंतु आजतागायत आरोग्याधिकार्‍यांच्या चुकीच्या धोरणामुळे व अधिकारी व कर्मचार्‍यांना चुकीच्या वागणुकीमुळे रक्तपेढी बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. महापालिकेच्या रक्तपेढीच्या कागदपत्रांची फाईल आरोग्य विभागामध्ये अनेक दिवस धूळखात पडून असल्यामुळे रक्तपेढीच्या कामकाजाबाबतचे निर्णय घेतले जात नाही. त्यामुळे  आरोग्याधिकार्‍यांच्या चुकीच्या कारभारामुळे रक्तपेढी बंद पडण्याच्या मार्गावर आलेली आहे. कोरोना संसर्गाच्या विषाणू काळामध्ये नागरिक भयभीत झाले आहे. इतर आजारांच्या रुग्णांवरही उपचार करणे कठीण झाले आहे. या उपचाराच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज पडत आहे.

No comments:

Post a Comment