श्रीरामपूर बंदबाबत दुफळी; मर्चंट असोसिएशनविरोधात व्यापारी सक्रिय
नगरी दवंडी /प्रिंतनिधी
श्रीरामपूर ः शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून 25 पेक्षा जास्त रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून शहरातील अनेक भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करुन बंद केले आहेत. तर चालू असलेल्या भागामध्ये लोकांचा वावर स्वैरपणे सुरु आहे. त्यातच मर्चंट असोसिएशनने आज पासून चार दिवस शहरातील बाजारपेठ बंद करण्याची घोषणा केलेली असताना सदरचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन न घेतल्याने काही व्यापार्यांनी बाजारपेठ बंद न ठेवण्याचे आवाहन केले आहे . त्यामुळे शहरातील काही भाग बंद तर काही सुरू असे चित्र निर्माण झाले आहे. परंतु यामुळे खरोखर कोरोना आटोक्यात येईल का, असा प्रश्न सामान्य लोक विचारीत आहेत. शहरातील वार्ड नंबर 2, पूर्णवाद नगर, चोथानी हॉस्पिटल परिसर, इंदिरानगर आदी भागांमध्ये कोरोनाचे पेशंट आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाने या भागांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून सर्व रस्ते बंद केले. व्यापारी असोसिएशन ने गुरुवार ते रविवार चार दिवस दुकाने बंद ठेवून बंद पाळण्याचे आवाहन केले.
मात्र सदरचा निर्णय घेताना सर्व व्यापार्यांना व दुकानदारांना विश्वासात का घेतले नाही असा प्रश्न उपस्थित करून अशोक उपाध्ये व त्यांचे सहकारी यांनी गेल्या चार महिन्यापासून व्यापार नसल्याने छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार यांची अवस्था खूप बिकट झाली आहे. मोठे व्यापारी होलसेल मध्ये आपल्या मालाची विक्री करून पैसे कमवत आहेत. परंतु छोट्या-मोठ्या लोकांकडे बंद ठेवण्या सारखी परिस्थिती नाही. तेव्हा या बदलाला विरोध करून आपले व्यवहार पूर्ववत सुरू ठेवावेत असे आवाहन मेन रोड, शिवाजी रोड येथे फिरून केले.
व्यापारयांमधील या मतभेदांमुळे श्रीरामपूरची बाजारपेठ सुरू राहणार की बंद होणार हे आज कळेलच. शेजारी बेलापूर गावांमध्ये सर्व व्यापारी, दुकानदार, नागरिक यांनी कडकडीत गाव बंद ठेवले त्याच पद्धतीचा निर्णय श्रीरामपूर शहरातही होण्याची आवश्यकता आहे.
शहरामध्ये पाच हजार पेक्षा जास्त दुकानदार असून विद्यमान व्यापारी असोसिएशन मध्ये मात्र पाचशेपेक्षा जास्त व्यापारी सभासद नाहीत. इतर व्यापार्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता व्यापारी असोसिएशन काम करीत असल्याने शहरातील सर्व छोटे-मोठे व्यापारी, भाजीपाला विक्रेते,सर्व प्रकारचे दुकानदार यांना सामावून घेऊन लवकरच श्रीरामपूर व्यापारी महासंघाची स्थापना करण्यात येणार असल्याचे संकेत काही व्यापार्यांनी दिले आहे.छोटे व्यावसायिक, मध्यम व्यापारी व मोठे व्यापारी सर्वांना बरोबर घेऊन हा व्यापारी महासंघ कार्यरत होणार आहे.
.बाहेरून येणार्यांना आवरा
शहरांमध्ये रात्रीच्या वेळी व दिवसादेखील छुप्या मार्गाने बाहेर गावचे अनेक लोक दाखल होत आहेत. विशेषतः मुंबई आणि औरंगाबाद येथून मोठ्या संख्येने हे लोक येऊन घरात लपवून ठेवले जात आहेत. त्यांनी दवाखान्यातून आपली तपासणी करून घेऊन स्वतः धोका टाळावा व शहरातील लोकांचाही धोका कमी करावा अशी अपेक्षा असून शहरातील सर्व रस्त्यांची नाकाबंदी करून बाहेरगावाहून विशेषत: रात्रीच्या वेळी येणार्यांना प्रतिबंध करण्याची व बेकायदेशीरपणे येणार्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे
No comments:
Post a Comment