आयुक्तांनी दिलं वसुलीचे ‘टार्गेट’!
अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेच्या मालमत्ता कराच्या थकबाकीचा आकडा 231 कोटींच्यावर गेला आहे. त्यामुळे मनपाचे आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रभाग अधिकार्यांना वसुलीचे ‘टार्गेट’ दिले आहे. मात्र हे ‘टार्गेट’ पूर्ण न झाल्यास वसुली अधिकार्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे, असा इशारा आयुक्त तथा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला आहे.
मार्च एन्ड जवळ आल्याने महापालिका प्रशासनाकडून मालमत्ताकराच्या थकबाकीच्या वसुलीसाठी जोर लावला आहे, गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या थकबाकी वसुलीसाठी आयुक्त तथा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी प्रभाग अधिकार्यांना वसुलीचे उद्दिष्ट दिल्याने संबंधितांनी चांगलाच धसका घेतला आहे. दरम्यान, या वसुलीअभावी मनपाच्या तिजोरीत खडखडाटच ऐकू येत होता . अधिकारी आणि कर्मचार्यांच्या पगारासाठी मनपाकडे पैशांचा मोठा प्रश्न उभा रहायचा. एलबीटीच्या अनुदानातून पगार करण्याची नामुष्की मनपावर येत होती . परिणामी शहरातील विकासकामे रखडली आहेत. मोठमोठ्या रस्त्यांच्या कामांना निधीची तरतूद करता करता मनपा प्रशासनाच्या नाकीनऊ यायचे . मात्र आयुक्त तथा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिलेले वसुलीचे ‘टार्गेट’ आणि ते पूर्ण न झाल्याबद्दल कारवाई यामुळे यावर्षी जास्तीतजास्त मालमत्ता कर वसूल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment