जिल्हा कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 18, 2021

जिल्हा कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर!

 जिल्हा कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर!

तिसर्‍या लाटेचं संकट टळलं..; जिल्हाधिकार्‍यांचा ग्रामीण लॉकडाऊन पॅटर्न यशस्वी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोविड-19 चा संसर्ग झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर पहिल्यांदाच कोरोना संकट संपू लागल्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाचं मान शांत होऊ लागलंय, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, बेरोजगारी आली, काहींचे उद्योगधंदे बंद पडले, अनेकांवर डोक्याला हात लावून रडायची पाळी आली. मात्र हळूहळू आता पुन्हा सर्व रुळावर आणण्यासाठी नागरिक आणि प्रशासन दोन्हींकडून प्रयत्न सुरू आहेत. अखेर या सगळ्या प्रयत्नांना यश मिळू लागलंय लसीकरणाचा या यशात मोलाचा वाटा आहे. नवरात्र संपताच आणि दिवाळीआधीच नगर जिल्हावासीयांना खर्‍या अर्थाने पॉझिटिव्ह बातमी आज मिळाली आहे. आज जिल्ह्यात फक्त 163 कोरोना बाधित आढळले. यामुळे नगर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असतानाच तिसर्‍या लाटेचा संकट टळलं असल्याचं दिसून येत आहे. नगर जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ज्या गावात दहा पेक्षा जास्त कोरोना बाधित आहेत अशा गावात ग्रामीण लॉकडाऊन केला होता. याचा ही परिणाम हळु हळु दिसू लागला आहे.
काही दिवसापुर्वी संगमनेर, पारनेच्या आकडेवारीमुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आज पारनेर 13 तर संगमनेर 12 असे रुग्ण आढळल्याने समाधान व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे नऊ ठिकाणही आकडेवारी दहा पेक्षा कमी असून सर्वाधिक असलेल्या राहुरीची आकडेवारी 21 वर आहे. आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 21, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 105 तर अँटीजेन चाचणीत 37 असे 163 कोरोना बाधित आढळून आले आहे.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- राहुरी 21, राहाता 19, नगर ग्रामीण 17, कोपरगाव 14, नगर शहर 13, पारनेर 13, संगमनेर 12, इतर जिल्हा 9, पाथर्डी 9, श्रीगोंदा 8, नेवासा 7, शेवगाव 6, अकोले 5, जामखेड 4, कर्जत 3, श्रीरामपूर 3 असे कोरोना बाधित आढळून आले. याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांने नियमांचे पालन करत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतल्यास लवकरच नगर जिल्हा कोरोनामुक्त झालेला पहायला मिळेल. यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
कोरोनासंसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. असा हा आठवडा कोव्हिड-19 चा संसर्ग पसरल्यानंतर तब्बल दीड वर्षांनंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूसंख्या शून्यावर आली आहे. जिल्ह्यातील अनेक लोकांना कोरोनाविरोधी लशीचा एक डोस मिळालाय. तर, कोरोनामुक्त होण्याचं प्रमाणही 97 टक्क्यांवर पोहोचलंय. कोरोनासंसर्गाची तीव्र लाट येण्याची शक्यता आता नाही.
कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेनंतर निर्बंध कडक करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यापासून कोरोना संसर्ग नियंत्रणात येऊ लागल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात झाली. मॉल, बाजारपेठा उघडण्यात आल्या. गणपती, दसरा आणि सणांच्या दिवसात होणार्‍या गर्दीमुळे रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. पण आता कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याचं चित्र दिसून येतंय.
कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे बाजारपेठा, दुकानं आणि मॉल उघडण्यात आलेत. चित्रपटगृह आणि नाट्यगृह येत्याकाही दिवसात उघडण्यात येणारेत. तर धार्मिकस्थळं लोकांसाठी खुली करण्यात आली आहेत. कॉलेज आणि शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.
त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल आता कोरांना मुक्तीच्या दिशेने सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

No comments:

Post a Comment