संगमनेरकर व हिंदुत्ववादी संघटनांची आंदोलनात मागणी.कत्तलखाने बंद करा.
पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
संगमनेर - संगमनेर शहरातील पाच कत्तलखान्यातून जवळपास 65 लाख रुपये किंमतीचे 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह पोलिसांनी 1 कोटी 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल केला असून भिवंडीतील प्राणी कल्याण अधिकारी यतीन जैन यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर शहरातील कत्तलखान्याच्या विषय ऐरणीवर आला आहे. गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेले कत्तलखाने कायम स्वरूपी बंद करावेत. अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी केली असून आज प्रांतकचेरी समोर आंदोलन सुरू केले आहे.
शहरातील जमजम कॉलनी, जोर्वे रस्ता, भारतनगर, कोल्हेवाडी रस्ता या परिसरात दररोज गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येते. संगमनेरातील गोमांस मुंबई, ठाणे तसेच परराज्यातसुद्धा पाठविण्यात येते. परंतू याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला आहे.
गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथील वाड्यांमध्ये शनिवारी (दि. 02) पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत तब्बल 1 कोटी 45 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला होता. यात 31 हजार किलो गोमांस जप्त करत 71 गोवंश जनावरांना जीवदान मिळाले होते.
राज्यात संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने कुप्रसिद्ध आहेत. येथील भारतनगर, जमजम कॉलनी, मदीनानगर, मोगलपूरा या भागात एकूण दहा मोठे आणि अनेक छोटे कत्तलखाने आहेत. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या सातत्याच्या कारवायात यातील बहुतेक कत्तलखाने बंद झालेली असून सध्या वरील पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करुन त्यांचे मांस मुंबई, गुलबर्गा (कर्नाटक), मालेगाव व औरंगाबाद सारख्या ठिकाणी पुरविले जाते. वारंवारच्या कारवायांनंतरही येथील कत्तलखाने बंद होत नसल्याने येथील स्थानिक पोलिसांचे कसायांशी आर्थिक साटेलोटे असल्याचे आरोपही यापूर्वी वेळोवेळी झालेली आहेत. मात्र प्रत्येक वेळी येथील अधिकार्यांनी कत्तलाखाने पूर्णतः बंद असल्याच्याच दर्पोक्ती केल्या आहेत. शनिवारच्या कारवाईने मात्र स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे पाडले असून संगमनेरात दररोज किती मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होते हे अगदी सुस्पष्ट झाले आहे. भिवंडी येथून संगमनेरात आलेले प्राणी कल्याण अधिकारी यतीन कांतिलाल जैन हे बजरंग दलाशी संबंधित आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ते संगमनेरात ठाण मांडून बसले होते. सदरच्या कारवाईसाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घालून या कत्तलखान्यांची अतिशय बारकाईने माहिती मिळविली. शनिवारी या कत्तलखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे कापली जाणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून कारवाईची मागणी केली. त्यानुसार त्यांनीही सदर प्रकरणाची गोपनीयता बाळगीत ही कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतरची राज्यातील सर्वात मोठी कारवाई संगमनेरात झाली आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार रफियोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरुन वरील पाच जणांवर भा.द.वी कलम 269, 429, महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्याचे कलम 5(अ), 1/9, 5 (क), 9 (अ) व प्राण्यांना निर्दयीपणाने वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्या कायद्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी जमजम कॉलनीतील वाहीद कुरेशी व मुद्दत्सर हाजी याच्या वाड्यातून 24 लाख रुपये किंमतीचे 12 हजार किलो गोवंशाचे मांस, 4 लाख रुपये किंमतीची 30 जिवंत जनावरे, 3 लाख 10 हजार रुपये किंमतीचा टेम्पो (क्र.एम.एच.04/4846), नवाज कुरेशी याच्या वाड्यातून 20 लाख रुपये किंमतीचे 10 हजार किलो गोवंशाचे मांस, 5 लाख 45 हजार रुपये किंमतीची 41 जिवंत जनावरे, 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचा टेम्पो (क्र.एम.एच.03/सी.पी.8858), जहीर कुरेशी याच्या वाड्यातून 11 लाख रुपये किंमतीचे 5 हजार 500 किलो गोवंशाचे मांस, परवेझ कुरेशी याच्या वाड्यातून 7 लाख रुपये किंमतीचे 3 हजार 500 किलो गोवंशाचे मांस, तसेच कत्तलखान्यांच्या बाहेरील बाजूला उभे असलेले 18 लाख रुपये किंमतीचे दोन टेम्पो (क्र.एम.एच.04/जी.आर.0090 व एम.एच.17/बी.वाय.2478) तसेच नवाज कुरेशी याच्या कार्यालयावरील छाप्यात 4 लाख 28 हजारांची रोकड व 10 हजार रुपयांचा मोबाईल, आणि या सर्व कत्तलाखान्यांमध्ये कत्तलीसाठीचे साहित्य असा एकूण 1 कोटी 4 लाख 50 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाईत कोणालाही अटक झालेली नाही.
No comments:
Post a Comment