महापौरांनी राजीनामा द्यावा- नितीन भुतारे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 5, 2021

महापौरांनी राजीनामा द्यावा- नितीन भुतारे.

 महापौरांनी राजीनामा द्यावा- नितीन भुतारे.

खड्डे बुजविण्यासाठी शिवसेना नगरसेवक आंदोलनाचा इशारा देत असतील तर...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज नगरकरांनी सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून दिले.शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिल्यानंतर सत्ताधारी म्हणून नगरकरांनी शिवसेनेला स्वीकारलं आणि सत्ताधारी स्वीकारल्यानंतर जर शिवसेना, शिवसेनेतील पदाधिकारी नगरसेवक शहरातील खड्डे बुजविण्यासाठी आंदोलनाचा इशारा देत असतील तर शिवसेनेच्या महापौर रोहिणी ताई शेंडगे यांना महापौर पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार राहत नाही. जर नगर शहरासाठी सर्व नगरसेवक तसेच सत्ताधारी,महापौरांना शहर विकासाचे नियोजन जमत नसेल तर त्यांनी राजीनामा देण्याची मागणी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केली आहे.
अहमदनगर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे हा एक मोठा विषय या जिल्ह्यात झाला असून या खराब रस्त्यांमुळे  शहरात चालणे सुद्धा अत्यंत धोक्याचे बनले आहे.परंतु हे सर्व करत असताना ज्यांच्यावर नगरकरांनी जबाबदारी दिली असे सत्तेत असलेले शिवसेनेचे नगरसेवक तसेच पदाधिकारी खड्डे बुजवण्या बाबत आयुक्तांना घेराव घालत आहेत. आयुक्तांना आंदोलनाचा इशारा देत आहेत. महानगरपालिकेच्या इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा देत आहे. न भूतो न भविष्यती आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. कुठेतरी शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे हे समोर येत आहे. अश्याच प्रकारे सत्ताधारी म्हणुन शिवसेना काम न करता अंतर्गत गटबाजी मुळे एक गट सत्तेच्या विरोधात आंदोलन करणार असेल व एक गट फक्त बघ्याची भुमिका घेणार असेल तर येणार्‍या काळात शहर विकासासाठी हि धोक्याची घंटा आहे.
शिवसेनेला सत्ता नगरकरांनी आपापसात भांडण करायला दिली नसुन शहर विकासासाठी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच खड्यांचा विषय प्रमुख सर्व शहरांमध्ये बनलेला आहे. त्यामुळे सर्व नगरसेवक, सत्ताधारी, शिवसेना, महा विकास आघाडी यांनी खरतर नगरच्या रस्त्या करिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निधीची मागणी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सत्तेत मुख्यमंत्री, नगरविकामंत्री असताना शहरातली रस्त्यांना निधी महापौरांना आणता येत नसेल तर या पदावर बसून काय उपयोग असा सवाल मनसेने केला आहे.
आजच्या परिस्थितीला खड्डे बुजवणे हा नगर शहरातील रस्त्यांचा पर्याय राहिलेला नसून नवीन रस्ते करणे हा एकमेव पर्याय नगर शहरात उरलेला आहे.त्यामुळे राज्यात सत्ता असताना आपल्या मंत्र्यांना निधीची  मागणी न करता पदाधिकारी, शिवसेनेतील नगरसेवक महानगरपालिकेतील आयुक्त अधिकार्‍यांना आंदोलनाचा इशारा देतात हे कुठेतरी दुर्दैवाची गोष्ट आहे. यांनी नगर विकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून नगर शहराकरिता नवीन रस्त्यांकरीता निधी उपलब्ध करून आणावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. आणि जर तुमच्याकडुन निधी उपलब्ध होत नसेल. नगर शहरातील रस्ते तुमच्याकडुन व्यवस्थित होत नसतील आणि तुमचे नगरसेवक पदाधिकारी असे वारंवार आंदोलनाचा इशारा देत असतील, आंदोलनासाठी अहमदनगर शहरात रस्त्यावर उतरत असतील तर सत्ताधारी म्हणून आपल्याला महापौरांच्या खुर्चीवर बसण्याचा कुठलाही अधिकार उरलेला नाही
येणार्‍या काळात शिवसेनेने सर्व रस्त्यांवरील खड्डयांचे  प्रश्न मार्गी लावावेत. जर प्रश्न मार्गी न लावता त्यांच्यात असलेल्या अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आणुन कुठेतरी एकमेकांना विरोध करायचा आणि कुठेतरी नगर शहराला विकासापासून वेठीस धरायचे असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापिही सहन करणार नाही याची नोंद शिवसेनेच्या महापौरांनी तसेच शिवसेना नगरसेवक पदाधिकार्‍यांनी घ्यावी. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर आपल्याकडून कामे होत नसतील तर येणार्‍या काळात आपण सत्ता भोगु नये. शिवसेना महापौर व नगरसेवक तसेच पदाधिकारी हे अहमदनगर शहरात सत्ताधारी म्हणुन शहरातली विकासाची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यातून आपण पळून जाऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे नितीन भुतारे यांनी शिवसेना महापौर व नगरसेवक यांच्यावर अशी खरमरीत टीका केली आहे.
शिवसेनेकडे आता हिंदुत्व राहिलेले नाही. हिंदूंचे संरक्षण सुध्दा शिवसेना करू शकत नाही. अंतर्गत गटबाजी मुळे शहरातली विकास सुध्दा करु शकत नाही. त्यांचेच नगरसेवक आंदोलनाचा ईशारा देत असल्यामुळे नगरकरांनी आता न्याय मागायचा कोणाकडे असा सवाल मनसेचे नितीन भुतारे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी हि मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment