बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू.
मुंबईत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती.
महाराष्ट्र हादरला.
मुंबई - बलात्काराच्या चार घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला आहे. मुंबईतील साकीनाका इथल्या बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे पिंपरी चिंचवड, अमरावती आणि वसईतही बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोपींना अटक करुन तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. मुंबईतील साकीनाका परिसरातील या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या आहेत. या महिलेवर 9 सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसर्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे.
अखेर आज तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ देखील राजावाडी रुग्णालयात पीडितेच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. पीडितेचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केल्यानंतर चित्रा वाघ अक्षरश: ढसाढसा रडल्या. या प्रकरणावर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाले. चित्रा वाघ यांनी यावेळी राज्य सरकार आणि महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. खरंतर मी आता निशब्द झालेय. आता आमचे शब्द संपलेत. महिलांचा अंत पाहू नका. ज्या पद्धतीनं एका महिलेवर अत्याचार झालाय तो राक्षसी होता. मी तिला बघून आले अक्षरश: तिचे आतडे कापले गेले आहे. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. ज्या पद्धतीनं हे अत्याचार चालले आहेत ते कुठंतरी थांबायला हवं. कुठं चाललोय आपण आणि काय चाललंय हे. महाराष्ट्राच्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असं चित्रा वाघ म्हणाल्या. गेल्या आठ दिवसांमध्ये आपण बघतोय किती अत्याचार झालेत. साडे तेरा वर्षांच्या मुलीवर ठाण्यासारख्या ठिकाणी अत्याचार झाले. आज सकाळीच अमरावतीत एका सतरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. सात महिन्यांची गर्भवती मुलगी तिनं स्वत:चं जीवन संपवलं आणि आज साकीनाक्यातील पीडितेचा मृत्यू झाला. आपण फक्त बघतोय. बाकी काहीही करू शकलो नाही आहोत.
No comments:
Post a Comment