सीना नदी पात्रातील पूरस्थितीस मनपा प्रशासन जबाबदार!
नागरी कृती मंचचे अध्यक्ष शशिकांत चंगेडेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सोमवारी रात्री नगर शहरात झालेल्या मुसळधार पावसाने सीना नदी पात्रातील अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. नदी पात्राच्या शेजारी बांधकामास दिलेल्या परवानग्या व नदीपात्रालगतच्या बांधकामामुळे नदी पात्राची रुंदी कमी झाल्यामुळे एक दिवसाचे पावसाचे पाणी शहरात घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रालगतची अतिक्रमणे उठविणे नदी पात्रातील गाळ काढणे. या ऐवजी पूररेषा वाढविण्याचा अजब प्रकार जलसंपदा विभागाने केल्यामुळे नदीच्या बाजूची अनेक बांधकामे धोक्यात आली आहेत. या बांधकामांना परवानगी देणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकृती मंचचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरेंना दिलेल्या निवेदनात चंगेडे यांनी म्हटले आहे की,नगर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयाने कोणत्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनाची कामे केलेली नाहीत. दर वर्षी 15मे पर्यंत ओढे नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करण्याची काळजी घेतली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून फक्त महापालिका आयुक्त यांना पत्र देण्यात धन्यता मानली जाते. अधिकारांचा गैरवापर करून बेकायदेशीर बांधकामांना मुकसंमती दिली जाते. नगर शहरातील पूर परिस्थिती निर्माण झाली यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणारे वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकारी व सेवक जबाबदार आहेत. यात जिल्हाधिकारी प्रथम जबाबदार आहेत. मागील 2 वर्षांपासून ओढे-नाल्यांची पहाणी तपासणी करून आम्ही आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी माहिती दिला आहे. तरी इतकी गंभीर बाबींवर काम न करता फक्त महापालिका आयुक्तांना एक पत्र देण्याशिवाय कोणतेही काम केले नाही. शहर व जिल्ह्यातील पूर स्थितीला आपत्ती व्यवस्थापन संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे गुन्हे दाखल होण्या इतपत पुरावेही मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे वेळोवेळी सादर केले आहेत. आता या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सेवकांना निदोर्ष सोडल्यास जनतेला चुकीचा संदेश जाईल. आपणच आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे राज्याचे अध्यक्ष आहात. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे 15 मे पूर्वी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतलेली नाही. आम्ही आठवण करून दिल्यावर बैठक घेऊन सारवासारव केली. या सगळ्या बाबी गंभीरपणे दखल घेण्या लायक आहेत, असे म्हणत चंगेडे यांनी कारवाईची मागणी केली आहे.
सीना नदीवरील कल्याण रस्ता परिसरातील पूल व काटवन खंडोबा रस्तावरील पुलावरून पाणी वाहत आहे. नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई परिसरात रात्री जोरदार पाऊस झाला. जेऊर गावातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पावसाचे पाणी दुकाने, घरे, कार्यालयांत शिरले. त्यामुळे मोठी आर्थिक हानीही झाली आहे. हे पावसाचे पाणी सीना नदीतून वाहत आहे. सीना नदीला पूर आल्यामुळे नगर-कल्याण रस्त्यावरील वाहतूक शहर बाह्यवळण रस्त्यावरून वळविण्यात आली होती. नगर शहरातील काही घरे व दुकानांत पुराचे पाणी पोचले. या सर्व प्रकाराला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व नगर महापालिका जबाबदार आहेत. नगर शहरात ओढे, नाले व नदी पात्र बांधकाम करण्याला महापालिकेने परवानग्या दिल्या आहे. पूर नियंत्रण रेषेतील जमिनीत परवानग्या देणार्या संबंधित अधिकार्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरीकृती मंचचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
No comments:
Post a Comment