‘तलाक’ चा मोबाईल वरून मेसेज, पती, सासूसासर्यासह 5 जणांवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
10 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ;
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः तलाक.. तलाक.. तलाक.. तीन वेळा हे शब्द उच्चारून मुस्लीम समाजात महिलांना तलाक देण्याची अमानुष प्रथा केंद्रातील मोदी सरकारने रद्द करण्यासाठी कायदा केला. या कायद्याची अंमलबजावणी सुरू असून मुस्लीम समाजातील एका विवाहितेला माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी छळ करून मोबाईल वरून तलाक. तलाक. तलाक. असा मेसेज करून बेकायदेशीरपणे तलाक देत घराच्या बाहेर काढल्या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरा, दीर व सासूच्या आईसह पाच जणांविरोधात गुरनं 363/2021, कलम 498(अ), 323, 504, 506, 34, मुमवि (अधि.संरक्षण) अधिनियम 2019 चे कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1 एप्रिल ते 26 ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली. संबंधित विवाहितेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खालेद ख्वाजा सय्यद (पती), ख्वाजा मैमुद्दीन सय्यद (सासरे), परवेज ख्वाजा सय्यद (दीर), परवीन ख्वाजा सय्यद (सासू), सुग्रावी ख्वाजा सय्यद (सासूची आई) (सर्व रा.मर्कज मस्जिद, रायमोह, ता.शिरुर कासार, जि.बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबर 2017 मध्ये मुस्लिम धर्मशास्त्रानुसार विवाह पार पडला. संबंधित विवाहितेच्या पतीला स्टेट बँकेत परमनंट नोकरीसाठी सासरच्या लोकांनी लग्नाच्या वेळीच 15 लाखांची मागणी केली. विवाहितेच्या वडिलांनी लग्नावेळी 3 लाख व नंतर 2 लाख असे पाच लाख रुपये विवाहितेच्या पतीला दिले. त्यानंतरही आणखी दहा लाखांची माणगी करत सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ करण्यात आला. भरोसा सेलमध्ये तक्रार झाल्यानंतर सामोपचाराने वाद मिटविण्यातही आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा विवाहितेचा छळ सुरूच राहिला. 26 ऑगस्ट रोजी विवाहितेच्या पतीने तिला मोबाईलवर ‘तलाक’चा मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. त्यानंतर घरातून बाहेर काढले. त्यामुळे विवाहितेने काल भिंगार कॅम्प पोलिसात फिर्याद दिली आहे.
No comments:
Post a Comment