शिरीषकुमारचे स्वातंत्र्यासाठी बलिदान ही अभिमानाची बाब ः शेख
हुतात्मा स्मरण प्रबोधन मंचतर्फे अभिवादन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्रातील नंदुरबार येथील शिरिषकुमार पुष्पेंद्रभाई मेहता या आठवीत शाळेत शिकणार्या मुलाने आपल्या देशासाठी बलाढ्य ब्रिटीश सत्तेला देशप्रेमाचे कर्तुत्व दाखवून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाला होता. यामध्ये छातीवर गोळ्या घेत स्वातंत्र्यासाठी स्वत:चे बलिदान दिले ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन उर्दू विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी अलिम शेख यांनी केले.
मुकुंदनगर येथील वाबळे कॉलनीत हुतात्मा स्मरण प्रबोधन मंचच्या कार्यालयात बालहुतात्मा शिरिषकुमार यांचा स्मृतीदिन साजरा केला. यावेळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मंचच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री.शेख बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष शेख कुतुबुद्दीन व सदस्य उपस्थित होते.
श्री.शेख पुढे म्हणाले, शाळेत शिक्षण घेत असतांना शिरिषकुमार यांनी महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श समोर ठेवून स्वातंत्र्य, देशाभिमान यांचे धडे घेतले. नंदुरबारमध्ये मोर्चा काढला, आंदोलनामध्ये सहभाग घेतला. 9 सप्टेंबरला नंदुरबारला प्रभात फेरी निघाली. तिरंगा झेंडा हातात घेवून वंदे मातरम्, भारत माता कि जय घोषणा दिल्या. संतप्त झालेल्या इंग्रज पोलिसांनी शिरिषकुमार यांच्या हातातून झेंडा घेण्याचा प्रयत्न केला. प्राण घ्या.. पण झेंडा मिळणार नाही, असे प्रतिउत्तर देत पोलिसांच्या गोळीबारात तो ठार झाला. त्यामुळे बाल हुतात्मा म्हणून बाल क्रांतीकारक शिरिषकुमार यांचे स्मारक आजही बलिदानाचे साक्ष देत आहे, असे श्री.शेख यावेळी म्हणाले.
मंचचे अध्यक्ष कुतुबुद्दीन शेख यांनी शिरिषकुमार यांचे स्वातंत्र्य चळवळीत सहभाग, देशप्रेमासाठी कर्तुत्व दाखविणारा लहानसा शिरिष यांच्या आठवणींना उजाळा देत आजच्या पिढीने आदर्श घेण्याची खरी गरज आहे, असे सांगितले.
No comments:
Post a Comment