कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांची राज्याच्या शिष्टमंडळामध्ये निवड
नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः स्वच्छ भारत मिशन 2.0 व अमृत मिशन 2.0 या केंद्र शासनाच्या अभियानाच्या लाँचिंग प्रसंगी उपस्थित राहणार्या महाराष्ट्र राज्याच्या 14 सदस्यीय शिष्टमंडळामध्ये कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांची निवड झाली असून 1 ऑक्टो रोजी दिल्ली येथे होणार्या कार्यक्रमासाठी ते रवाना झाले आहेत.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन 2 व अमृत मिशन 2 या अभियानाचे दि 1 ऑक्टो रोजी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून या कार्यक्रमासाठी प्रत्येक राज्याच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याबाबत निमंत्रित करण्यात अांले असून यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार्या 14 व्यक्तींच्या शिष्टमंडळामध्ये मंत्री महोदया पासून वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे. यामध्ये नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे, त्याचे स्वीय सहाय्यक बालाजी खातगावकर, विशेष अधिकारी राजेश खवले, नगर विकास विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगर विकासचे मुख्य सचिव महेश पाठक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त किरण कुलकर्णी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे, नगरविकासचे सह सचिव पांडुरंग जाधव, स्वच्छ भारत मिशनचे राज्य समन्वयक अनिल मुळे, अहमदनगर महानगरपालीका उपआयुक्त यशवंत डांगे, बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमिता दगडे, बल्लाळपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्या टीम मध्ये कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांची निवड झाली आहे.
कर्जत नगर पंचायतीने महाराष्ट्र राज्याच्या माजी वसुंधरा या स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला असून कर्जत शहरात स्वच्छता, वृक्षारोपण व इतर सामाजिक कामांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळत आहे. कर्जत शहरात सर्व सामाजिक संघटनांच्या प्रयत्नातुन शहरात स्वच्छतेचे मोठे काम उभे राहिले असून पूर्ण शहर स्वच्छ व सुंदर झाले आहे, या कामात मुख्याधिकारी गोविंद जाधव यांचा मोलाचा वाटा आहे. कर्जत नगर पंचायतीच्या कामात सुसूत्रता आणत अत्यंत सकारात्मक काम गेली काही महिन्यात जाधव यांनी उभारले असून माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळाण्यासाठी त्यांनी सर्वाना बरोबर घेऊन खूप मेहनत घेतली होती, यावर्षी राज्यात पहिला क्रमांक मिळविण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आहे,
केंद्र शासनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या टीम मध्ये त्याची निवड झाल्या नंतर सर्व सामाजिक संघटनाच्या दैनंदिन श्रमदानात त्याचे अभिनंदन करण्यात आले, यावेळी हा सन्मान माझा नसून कर्जतच्या जनतेचा आहे व तेथे मी कर्जतचे प्रतिनिधीत्व करणार आहे असे जाधव यांनी म्हटले.
कर्जत शहरात 2 ऑक्टो 2020 रोजी शहरातील नागरिकांनी एकत्र येत स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत शहरात स्वछता करण्यासाठी श्रमदान करण्यास सुरुवात केली व गेली वर्षभर नियमित दररोज हे श्रमदान सुरू असून दि 1 ऑक्टो रोजी दिल्ली येथे कार्यक्रम असून व्याच दिवशी वर्ष पूर्ती होत असल्याने कर्जत मध्ये महा श्रमदानाचे आयोजन केले असून कर्जतकरांच्या दृष्टीने हा सन्मानच आहे.
No comments:
Post a Comment