भाजपा नगरसेविका सोनाली चितळेंची महापौरांकडे मागणी...
घरपट्टी, पाणीपट्टी माफीसाठी विशेष सभा बोलवा.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नालेगाव भागातील प्रभाग क्रमांक 13 मधील मनपाच्या सक्रिय नगरसेविका व स्थायी समिती सदस्य सोनालीताई अजय चितळे यांनी महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्याकडे ’कोरोना नैसर्गिक आपत्तीकाळातील घरपट्टी पाणीपट्टी माफी’च्या ठरावासाठी ’विशेष सभा’ बोलावण्याची मागणी एका निवेदनाव्दारे केली आहे.
सौ.चितळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सन 2019 मार्च पासून कोविड-19 या नैसर्गिक आपत्तीने आपल्या शहरातच नव्हे तर देशभरात व जगभरात थैमान घातलेले आहे. या महामारीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अनेकांच्या घरातील कर्ते पुरूष, स्त्रिया, मुले दगावलेली आहेत. अनेकांच्या नोकर्या रोजगार गेलेला आहे. म. न. पा. आयुक्तांनी लावलेल्या लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झालेले आहे. भाजी विक्रेते, फळविक्रेते, कटलरी विक्रेते, शहरातील मंगल कार्यालये, सलून, ब्युटीपार्लर, हॉटेल, लॉज, कापड दुकानदार, शालेय साहित्य विक्रेते, रिक्षावाले, फोटो स्टुडिओ, पत्रकार, फोटोग्राफर, इलेक्ट्रॉनिक माध्यमे प्रतिनिधींंसह सर्वच धंद्यावाल्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. आर्थिक नुकसानी बरोबरच मानसिक व शारिरिक नुकसान देखील झालेले आहे. कोविड - 19 या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपणास मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, 1949 च्या ’कलम 133 नुसार शहरातील नागरीकांना घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याचा अधिकार आहे. आपण हा अधिकार जनहितासाठी वापरला पाहिजे नागरीकांना आपत्ती काळात प्रथम दिलासा देणे हे गरजेचे आहे. आपण या अत्यंत गंभीर विषयाबाबत तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलावून सदर विषय मंजूर करावा. अन्यथा, शहरातील सर्व नागरीकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ही निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment