शक्ती व भक्ती एकत्र आल्यास, भाविकांचा उद्रेक - वसंत लोढा.
मंदिर उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देत आता सर्व व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. परंतु भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सर्व मंदिरे बंद आहेत. सर्व देवी-देवतांची व साधू-संतांची मंदिरे ही समस्त हिंदू जणांची शक्तीस्थळं आहेत. शासनाने भाविकांच्या मानसिकतेचा अंत पाहू नये. शक्ती आणि भक्ती एकत्र आल्यास भाविक उद्रेक करतील. नगर जिल्ह्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी त्वरित खुली करावी, अन्यथा मंदिर बचाव कृती समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगर मंदिर बचाव कृती समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते वसंत लोढा यांनी दिला आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यासह जिल्ह्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. त्याच्या निषेधार्थ नगर मंदिर बचाओ कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी वसंत लोढा बोलत होते. वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना निवेदन देऊन तातडीने सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करावी, अन्यथा मंदिर बचाओ कृती समिती तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला.
यावेळी सुभाष मुथा यांनीही मंदिरे त्वरित उघडण्याची मागणी करत मंदिरे बंद असल्यामुळे मंदिरांवर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे सांगितले. याप्रसंगी बापू ठागणे, गौतम कराळे यांंनी देशातील इतर राज्यामध्ये मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत, मात्र महाराष्ट्रात मंदिरे बंद का? असा प्रश्न उपस्थित केला.
याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे बापू ठाणगे, जैन मंदिर अध्यक्ष सुभाष मुथा, प्रा.सुनिल पंडित, बाळासाहेब भुजबळ, कैलास दळवी, हरिभाऊ डोळसे आदिंसह विविध क्षेत्रातील नागरिक शांतीलाल कोठारी, राजू पडोळे, विलास देवी, पराग गावडे, सागर होनराव, एस.एस.पाटील, राजेश सटाणकर आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment