एकजुटीने सरकारकडे केश शिल्पी बोर्डाची मागणी करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

एकजुटीने सरकारकडे केश शिल्पी बोर्डाची मागणी करा

 एकजुटीने सरकारकडे केश शिल्पी बोर्डाची मागणी करा

संजय पंडित यांचे सर्व संघटनांना आवाहन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता आपल्या नाभिक समाजाला ओबीसी प्रवर्गातून बीसी प्रवर्गाचे आरक्षण लवकर मिळेल असे वाटत नाही, कारण आरक्षणाचा मुद्दाच सध्या तरी धूसर बनत चालला आहे. ओबीसी प्रवर्गात आमची होणारी फरफट आम्ही वर्षानुवर्षे सहन करीतच आहोत.त्यातुन मराठी समाजा सारखा प्रस्थापित समाजही आता आरक्षणाचे महत्व कळल्यामुळे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागू लागला आहे. आपल्या नाभिक सामाजा सह परीट आणि धनगर समाज आरक्षणासाठी वर्षानुवर्षे लढत आहेच, समाज विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मिळणेही देखील आता कठीण होऊन बसले आहे. अशा अवस्थेत नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मागील सरकारने गठित केलेल्या केश शिल्पी बोर्डाचे या आघाडी सरकारकडून पुनर्गठन करून घेणे सकल नाभिक समाजाच्या हिताचे ठरणार आहे.
केश शिल्पी बोर्ड हे सकल नाभिक समाजाचा सर्वांगीण विकास साधुन सलुन आणि ब्युटी पार्लर व्यवसायाला वरदान ठरणारे हक्काचे महामंडळच आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, हरयाणा आणि छत्तीसगड या राज्यातील नाभिक समाजाने वेळीच या बोर्डाचे महत्व समजून घेतले आणि एकजुटीने सरकारकडे बोर्डाची मागणी केली. तेथील समाज बांधव आज केश शिल्पी बोर्डाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि रोजगाराच्या विविध सुविधांचा फायदा घेऊन व्यवसाय आणि वयक्तिक विकास करीत आहेत.लॉक डाऊन च्या काळात देखील इतर सर्व व्यवसाय अडचणीत असताना केवळ केश शिल्पी बोर्ड मदतीला असल्यामुळे त्या राज्यांतील आपला नाभिक बांधव हतबल होताना दिसला नाही.
मग आम्हीच मागे का राहावे....? तुलनेने आमचे राज्य सर्व बाबतीत खूप प्रगत आहे. गरज आहे फक्त, अमच्याएकजुटीच्या एकमुखी मागणीची. आज राजकीय पटलावर आमच्या समाजाचे स्थान शुन्य आहे. कुणी समाजाच्या नेत्याने कितीही बढाया मारल्या तरी राज्याच्या राजकारणात संघटना अभावी आपल्या समाजाला काहीच किंमत नाही, म्हणूनच तर आजवर कोणत्याही सरकारने आमच्या एकाही मागणीचा कधीच गांभीर्याने विचार केला नाही.राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या माध्यमातून आम्ही विविध पक्षांच्या मान्यवर नेत्यांना, मंत्र्यांना भेटून समाजाची व्यथा मांडून केश शिल्पी बोर्डाची गरज समजाऊन सांगत आहोत. सर्वच मान्यवर नेत्यांकडून सहानुभूतीचा प्रत्यय पहावयास मिळत आहे.आता फक्त अमच्या मागणीचा सरकारवर दबाव यायला हवा. प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्य मंत्र्यांकडे केश शिल्पी बोर्डाच्या मागणीचे निवेदन जायला हवे.
अशा प्रकारे मागणीचा जोर वाढून सरकारवर दबाव वाढला पाहिजे. प्रत्येक संघटनांनी स्थानिक पातळीवर आपल्यातील गटबाजी विसरून आणि दळभद्र्या राजकारणाला तिलांजली देऊन कोणत्याही प्रकारे समाजातील स्वयंघोषित नेत्यांच्या दिशाभूल करणार्‍या आश्वासनांना आणि भुल थाप्पांना बळी न पडता केवळ समाज हितासाठी निवेदन दिलेच पाहिजे, कारण केश शिल्पी बोर्ड कुणा एका संघटनेला मिळणार नाही त्यामुळे कुणा एका संघटनेचे वर्चस्व देखील त्यावर असणार नाही. केश शिल्पी बोर्ड सकल नाभिक समाजाच्या विकासासाठी असणार आहे, आणि सर्वच जिल्ह्याच्या बांधवांना त्यात प्रतिनिधित्व असनार आहे हे सर्वांनी समजून घ्यावे.
सध्याचे आघाडी सरकार अतिशय निर्दयी पणाने आपल्या समाजाला दुटप्पी वागणून देत आहे. आम्ही वेळीच जागे होणे गरजेचे आहे, आपल्या हक्काच्या शिल्पी बोर्डाचे महत्व सर्वांनी समजून घेतलेच पाहिजे. बांधवांनो, आम्ही आमच्या हक्काची मागणी सरकार कडे करीत आहोत, इतर राज्यांप्रमाणे आम्हीही आमच्या हक्काचे दावेदार आहोत, त्यामुळे आमची ही मागणी सरकारला मान्य करावीच लागेल.  याच शिल्पी बोर्डाच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने आपल्या नाभिक समाजात परिवर्तन घडवता येईल आणि शैक्षणिक व आर्थिक विकास साधता येईल. आणि हे विकासाचे परिवर्तन समाजाला निर्भर करून आपल्या पारंपरिक सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायालाही नवसंजीवनी देईल आणि समाजातील गटबाजीच्या चढाओढीलाही नक्कीच आळा बसेल यात शंकाच नाही.असे कळकळीचे आणि तळमळीचे आवाहन राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष श्री. संजय पंडित यांनी नाभिक समाजातील सर्व संघटनांना केले आहे.

No comments:

Post a Comment