पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना राबवावी - संतोष पवार
प्रहार संघटना व अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने तपोवन हडको परिसर हरित करण्यासाठी वृक्षरोपण
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील तपोवन हडको परिसर हरित करण्यासाठी प्रहार संघटना व अष्टविनायक मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रहारचे शहर उपाध्यक्ष इंजि. भाग्येश शिंदे यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रहारचे प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, सचिव प्रकाश बेरड, जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या अनिता कोंडा उपस्थित होत्या.
प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना सर्वांनी राबवावी. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.
शहर उपाध्यक्ष इंजि. भाग्येश शिंदे यांनी प्रास्ताविकात वृक्षरोपणाचे महत्त्व विशद करुन या उपक्रमांतर्गत एक हजार झाडे लावण्याचा संकल्प व्यक्त करुन तपोवन परिसर हिरवाईने फुलविणार असल्याचे सांगितले.विनोदसिंग परदेशी यांनी प्रत्येकाने निसर्गाचे समतोल साधण्यासाठी एक तरी झाड लावण्याची गरज आहे. कोरोना काळात निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईमुळे वृक्षाचे महत्त्व सर्वांना कळाले आहे. ऑक्सिजनसाठी वृक्ष हेच एकमेव स्त्रोत असून वृक्षांच्या लागवडीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनिता कोंडा यांनी मानवाने निसर्गावर अतिक्रमण करुन त्याचे समतोल बिघडवले आहे. हल्ली ऋतू देखील बदलले असून, याला मनुष्य जबाबदार आहे. जंगलाची कत्तल करण्यात आल्याने जंगली प्राणी मनुष्य वस्तीत आढळत आहे. प्रत्येकाने निसर्गाचे समतोल साधण्यासाठी एक तरी झाड लावण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी विविध प्रकारचे देशी झाडे लावली. या उपक्रमासाठी गुरु क्षेत्रे, अभिषेक गवळी, परशुराम दरेकर, अंबादास कोंडा, अशोक शिंदे, अमित शेख, बाळासाहेब चव्हाण आदिंसह प्रहार करिअर अकॅडमीचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment