संगमनेर नगरपालिका निवडणुकीवर विखेंचे लक्ष्य !
भाजपा कार्यकर्त्यांसमवेत आढावा बैठक
नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः आपल्या गावात गणात आणि प्रभागात प्रत्येक नागरीकाचे लसीकरण झाले की नाही याची माहीती घेण्यासाठी संपर्क अभियान सुरू करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या योजनांचा संदेशही घरघरात पोहचवा असे आवाहन खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी खा.डॉ.विखे यांनी संवाद साधला. जेष्ठ भाजपा कार्यकर्ते भाजयुमो पदाधिकारी यांच्या स्वतंत्र बैठका घेवून त्यांनी आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीचा कानमंत्र दिला. हेवेदावे आरोप-प्रत्यारोप विसरून पक्ष संघटनेत मेहनत घेवून जनतेपर्यत पोहचलेल्या कार्यकर्त्यांचे मूल्यमापन उमेदवारी देताना होईल असे स्पष्ट संकेत त्यांनी देवून टाकले.
यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ अशोक इथापे, रखमाजी खेमनर, डॉ.सोमनाथ कानवडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, उपाध्यक्ष जावेद जहागिरदार, नगरसेविका सौ.मेघा भगत, व्यापारी आघाडीचे शिरीष मुळे, काशिनाथ पावसे, अमोल खताळ, संघटक योगिराजसिंग परदेशी, शैलेश फटांगरे, दिपेश ताटकर, राहुल भोईर, मंजित गायकवाड, वैभव लांडगे, ऍ़ड.दिपक थोरात, नानासाहेब दिघे, केशव दवंगे, ऍ़ड.संदीप जगनर, संदीप घुगे, गोकूळ लांडगे, अविनाश तळेकर, कोंडाजी कडनर, साहेबराव वलवे, संदीप देशमुख यांसह तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत बोलताना खा.सुजय विखे पाटील यांनी थेट आगामी निवडणुकांचा उल्लेख केला. या निवडणुकांना सामोरे जायचे असेल तर संघटन मजबूत झाले पाहीजे. पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेले काम जनतेपर्यत पोहचवावे लागेल. निवडणुका आल्या तरच जनतेकडे जायचे हे दिवस आता संपले आहेत. लोकांसाठी काम आणि प्रश्नांसाठी संघर्ष करणार्यांच्या पाठीशी जनता उभी राहाते हा विचार मनात ठेवून आपले गाव गण आणि बुथ सक्षम करण्याबाबत त्यांनी सूचित केले.
स्थानिक पातळीवरच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेले काम लोकांना सांगण्यासाठी पुरेसे आहे. देशात मोदीजींमुळे सर्व नागरिकांना मोफत लस मिळाली. लाभार्थींना दिवाळी पर्यत मोफत धान्य मिळाले. या सर्वाचा आढावा कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रत्येक कुटुंबात जावून घेतला तरी पक्षाचे जनसंपर्क अभियान होवू शकेल. केंद्र सरकार राबवित असलेल्या योजनांचा प्रसार आणि प्रचार हाच आपल्या सर्वाचा अजेंडा असेल. स्थानिक प्रश्नाबाबत लवकरच एक पुस्तिका काढून अपयश दाखवून देणार असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले.
No comments:
Post a Comment