राज्यात सहकार चळवळ मोडण्याचे काम- अण्णा हजारे.
49 साखर कारखान्यांची चौकशीची ईडीकडे मागणी
पारनेर - धनंजय गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, विठ्ठलराव विखे यांनी प्रयत्न करून राज्यात सहकार चळवळ वाढविण्यासाठी मोठे काम केले. आपल्या राज्यातील सहकार चळवळीचे अनुकरण करत इतर राज्यांनी केले. मात्र, आज आपल्याच राज्यात सहकार चळवळ मोडण्याचे काम सुरू आहे, याचे दु:ख वाटते. आता याच राज्यात ही सहकार चळवळ मोडीत काढून खासगीकरण करण्याच्या मागे लागले आहे. हा खूप मोठा धोका आहे. यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागले आहेत. सातारा येथील जरांडेश्वर साखर कारखाना विक्री व्यवहारात ईडीने लक्ष घातल्यामुळे आता हे प्रकरण बाहेर पडेल. त्याच धर्तीवर राज्यातील तक्रारी केलेल्या सर्व 49 सहकारी साखर कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ईडीकडे पत्राद्वारे केली आहे.
हजारे म्हणाले, जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना व गुरूकमोडिया कंपनी यांची सर्व कागदपत्रे आमच्याकडे यापूर्वीच आली होती. ती कागदपत्रे आम्ही उच्च न्यायालयात दाखल केली आहेत. मात्र, न्यायालयाने सांगितले की, तुमची तक्रार दाखल पाहिजे. त्यानंतर आम्ही मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात चार हजार पानांची तक्रार दाखल केली होती. कारखान्याची तक्रार नोंदविल्यानंतर सरकारने मात्र चौकशी करण्यासाठी त्यांच्या मर्जीतील माणसाला नियुक्त केले. त्यांनी या प्रकरणात काही तथ्य नाही, असा अहवाल सरकारला दिला. आम्ही पुन्हा आता सत्र न्यायालयात गेलो. तिथे ही केस अजून बाकी आहे. तिथून ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली, असे हजारे यांनी सांगितले.
तत्कालीन सरकारच्या काळात 49 कारखाने कवडीमोल भावाने विकले. संगनमताने सर्व कारखाने कोणाला कोणता कारखाना द्यायचा, याचे सर्व नियोजन करून विकण्यात आले. आम्हाला कुठल्याही पक्ष व पार्टीचे घेणे देणे नाही, याची चौकशी व्हायला हवी, असे हजारे म्हणाले.
No comments:
Post a Comment