तरुण पिढ्या घडवण्यात एसटी कर्मचार्यांचा मोठा वाटा ः वाघमारे
पारनेर आगारातील सहा कर्मचारी सेवानिवृत्त..
नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः ग्रामीण भागातील तरुण पिढ्या घडवण्यात एसटी च्या कर्मचार्यांचा मोठा वाटा असल्याचे मत पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे यांनी व्यक्त केले.
पारनेर आगारातील वाहतूक नियंत्रक दत्तात्रेय शेळके, अरुण पवार, कार्यशाळेतील मुख्य तंत्रज्ञ श्रीराम काळे, चालक अप्पासाहेब लटांबळे, सुभाष करकंडे, मोहन औटी यांच्या सेवानिवृत्ती निमीत्त आयोजित निरोप समारंभात वाघमारे बोलत होते.
उद्योजक अर्जून भालेकर, शिरूर नगरपरिषदेचे नगरसेवक नीलेश लटांबळे, मनसेचे शहराध्यक्ष वसिम राजे,स्थानक प्रमुख सतिश कांबळे, अंजाबापू ठुबे, एम. के. शिंदे, बलभिम कुबडे आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचार्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला.
पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्यात शिक्षणाशिवाय पर्याय नाही.तालुक्यातील प्रत्येक गावात विद्यार्थ्यांच्या शाळा, महाविद्यालयांच्या वेळेनुसार एसटीची सेवा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुकर झाले. एसटीच्या कर्मचार्यांनी सेवाभावी वृत्तीने काम केले. तालुक्यातील तरुण पिढ्या घडवण्यात, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यात एसटी च्या कर्मचार्यांचा मोठा वाटा आहे. एसटीची सेवा उपलब्ध नसती तर ग्रामीण भागातील विशेषतः विद्यार्थीनींना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागले असते.असे वाघमारे म्हणाले. उद्योजक अर्जून भालेकर म्हणाले की, शहरी भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र ग्रामीण भागात एसटी शिवाय पर्याय नाही.एसटीमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली. ’लाल परी’ने राज्याच्या ग्रामीण भागात विश्वास कमावला आहे.याचे श्रेय एसटीच्या कर्मचार्यांना आहे.
नगरसेवक नीलेश लटांबळे, अंजाबापू ठुबे, एम. के. शिंदे, कांबळे यांनी निवृत्त कर्मचार्यांना पुढील आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. सुरेश औटी यांनी सूत्रसंचालन केले.दिगंबर अडसूळ यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment