निळोबाराय माझ्या देशावरील व जगावरील कोरोनाचे संकट दूर करतील : आ.लंके
संत निळोबाराय महाराज पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात
नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिपंढरपुर म्हणून ओळख असलेले पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री. संत निळोबाराय महाराज पालखीचा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. एकोबा तुकोबांच्या नाम घोषात अवघी पिंपळनेर नगरी दुमदुमली होती. वारकरी संप्रदायातील अखेरचे व पाचवे संत म्हणून ओळखले जाणारे श्री. संत निळोबाराय महाराज यांच्या राहत्या वाड्यातून विठ्ठल रुक्मिणीची महापुजा व पालखी पूजन आमदार निलेश लंके, पोलिस निरिक्षक घनश्याम बळप तसेच तुकाराम महाराजांचे वंशज व तुकाराम महाराज दिंडी सोहळ्याचे प्रमुख माणिक मोरे सपत्निक तसेच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख बाळासाहेब अरपळकर, निळोबाराय वंशज गोपाळ मकाशीर आदींच्या हस्ते पार पडली.
हे निळोबाराया माझ्या देशावरील व जगावरील कोरोणाचे संकट दूर होवो व पुढील आषाढी एकादशीला माझ्या सर्व वारकरी भाविकांना पंढरपूर च्या पांडुरंगाचे दर्शन घडू दे अशी निळोबाराय चरणी प्रार्थना केल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे दिंडीचे प्रस्थान झाले असून 19 जुलै रोजी सकाळी दहा वाजता निळोबारायाचे पादुका शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करून मोजका भाविकांसह परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बसने पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे तोपर्यंत पालखी निळोबाराय मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असल्याचे निळोबाराय देवस्थान कार्याध्यक्ष अशोकराव सावंत यांनी सांगितले.
वृक्ष टिकले तरच ही जीवसृष्टी टिकणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी पासून मुकावे लागत आहे. भाविकांनी नाराज न होता आषाढी वारीची आठवण म्हणून यावर्षी एका झाडाची लागवड करावी. ज्या वारकर्याचे झाड पुढील वर्षी चांगले असेल त्या वारकर्याचा सत्कार देहू संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात येईल.
No comments:
Post a Comment