आमदार, महापौर, जिल्हाधिकारी, आयुक्त या रस्त्यावरून कधी ना कधी गेलेच असतील ना... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

आमदार, महापौर, जिल्हाधिकारी, आयुक्त या रस्त्यावरून कधी ना कधी गेलेच असतील ना...

 आमदार, महापौर, जिल्हाधिकारी, आयुक्त या रस्त्यावरून कधी ना कधी गेलेच असतील ना...

शहरात अनेक रस्त्यांवर,खड्डेच खड्डे!
मनपा प्रशासनाच्या कारभाराचं पितळ पावसाने केलं उघड.




नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या दोन दिवसांपासून नगर शहरात पाऊस सुरू आहे. या पावसाने मात्र अहमदनगर महापालिका प्रशासनाच्या कारभाराचं पितळ मात्र उघडं पडलय. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. नगर-कल्याण रोड वरील नेप्तीनाक्यापासून ते शिवाजीनगर पर्यंत, सिद्धार्थनगर लालटाकी, रेसिडेन्शिअल शाळा, चितळी रोड ते नेता सुभाष चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते स्टेट बँक चौक या प्रमुख ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता असली ,तरी मनपा प्रशासन या खड्ड्यांची दखल घ्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील आमदार, जिल्हाधिकारी, महापौर, आयुक्त या प्रमुख रस्त्यांवरून कधी ना कधी गेले असतील. मग या प्रतिनिधींना हे खड्डे कधीच दिसले नाही का हा खरा प्रश्न आहे. अनेक वर्षांपासून शहरातील या रस्त्यांची कामे मनपा प्रशासन ठेकेदारांकडून करून घेते मग पुन्हा खड्डे का पडतात? ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असतील तर मग या कामाचा उपयोग काय असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
अहमदनगर शहरातील महत्वाच्या रस्त्यांपैकी एक असणारा रस्ता म्हणजे. जिल्हाधिकारी कार्यालय ते स्टेट बँक चौक रस्ता. या रस्त्यावरुन दिवस रात्र वाहतुकीची वर्दळ असते. शहरातील उड्डाणपुलाच्या कामामुळे जुने बस स्थानक ते स्टेट बँक चौक या रस्त्यावरील वाहतुकही या रस्त्यावरुन होत आहे.या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.वाहन चालकांंना आपले जीव मुठीत धरुन या रस्त्यावरून जावे लागते.अनेक लोकप्रतिनीधी आणि पालकमंत्र्यांची वाहने या रस्त्यावरुन येत असतात.जिल्हाधिकार्‍यांचे वाहन दिवसभरात चार ते सहा वेळा या रस्त्यावरुन जाते.या सर्वांना या रस्त्याची अवस्था दिसत नाही हेच अजब वाटते.मोठ-मोठे अधिकारी आणि नेते मंंडळींना या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत काही करता येत नसेल तर जन सामान्यांनी कुठे जावे असा प्रश्न पडतो.
जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावर पडलेल्या हजारो खड्ड्यांबाबत अनभिज्ञ आहेत की काय? आणि काही स्थानिक नागरिकांशी या रस्त्याबाबत विचारणा केली असता त्यांचे म्हणणे आहे की कुणासही काहीही घेणे देणे नाही.आज छोटे-मोठे अपघात रोज होत आहेत. ज्येष्ठ नागिरक आणि महिलांना तर या रस्त्यावर वाहन चालविणे कठीण बनले आहे.अहमदनगर शहराला सुशोभित करण्याचे आश्वासन देणारे आणि विकासाच्या गप्पा मारणारे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची वाट पहात आहेत का असा प्रश्न जनसामान्य नागरिक विचारत आहेत.जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता हा मृत्युचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर वाहन चालविणे कठीण झाले असुन लवकरात-लवकर या रस्त्याबाबत निर्णय घेऊन प्रशासनाने आणि लोकप्रतिनीधींनी वेळीच निर्णय घ्यावा अन्यथा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment