फादर स्टॅन स्वामी यांच्यावर लादलेल्या आरोपातून त्यांना मुक्त करावे ः पवार
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू ही नैसर्गिक घटना नसून क्रूर हत्या आहे. ही घटना निंदनीय आणि निषेधार्ह अशी आहे. सद्य केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निष्पाप फादर स्टॅन स्वामींना आपला जीव गमवावा लागला असल्याची भावना महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा जयमाला ताई पवार यांनी व्यक्त केली. उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना या विषयासंदर्भातील निवेदन देण्यात आले.
सिस्टर पवार पुढे म्हणाल्या की, समाजासाठी निस्वार्थीपणे योगदान देणार्यांसाठी नक्कीच हा विषय धोकादायक असून एकूण समाजासाठी फार गंभीर व चिंताजनक आहे. परंतु देशात घडणार्या या प्रकारच्या अमानवीय घटनावर आपण व देशातील संविधान प्रेमी खासदार आणि इतर नेत्यांनी आवाज उठवणे अपेक्षित आहे. या विषयाला घेऊन महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे आमच्या सहीत काही सामाजिक संस्था एका आंदोलना द्वारे अशी मागणी करणार आहोत की, फादर स्टॅन स्वामी यांचेवर खोटे गुन्हे दाखल करून समाजसेवी वृत्तीवर जो अन्याय करण्यात आला. त्याचे समर्थन होणे शक्य नाही. म्हणूनच फादरांना त्यांच्यावर दाखल गुन्हे मरणोपरांत रद्द करून त्यांना निर्दोष घोषित करावे, तसेच फादर स्टॅन स्वामींच्या सोबत व त्या एकाच गुन्ह्यात अडकवलेल्या इतरांचीही निर्दोष सुटका करावी. तरी सर्व समविचारी देशाच्या नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की, या आंदोलन वजा प्रचार मोहिमेत सहभागी होऊन फादर स्टॅन स्वामी व त्या सोबतच्या लोकांवर झालेल्या अन्याय विरोधात आवाज उठवावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भूमिका घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा. हीच फादर स्टॅन् स्वामी यांना खर्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. असेही सिस्टर पवार यांनी म्हटले.
यावेळी, महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे नगर शहराध्यक्ष अमोल लोंढे, उपाध्यक्ष सुनील वाघमारे, डेव्हिड केदारी, सत्यशील शिंदे आदींच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment