सिद्धार्थनगर येथील प्रलंबित समस्यांचे आयुक्तांना निवेदन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने सिद्धार्थनगर मधील विविध समस्यांबाबतचे निवेदन मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. याप्रसंगी दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर, पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, बाळासाहेब जगधने, बाबासाहेब करपे, अक्षय कांबळे, गणेश शेकटकर, आदेश बचारे व नागरिक उपस्थित होते. आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिद्धार्थनगर भागात अनेक नोकरदार वर्ग राहत असल्याने पाण्याची वेळ बदलून पाणी पहाटे 3 ते 4 या वेळेत सोडावे. तसेच या भागातील नाल्यात मैला सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत, त्याचे पॅचिंग होणे गरजेचे आहे. तसेच रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने अपघात, मुली-महिलांचे छेेडछाड व चोर्यांचे प्रमाणही वाढले आहे. परिसरातील शौचालयाची दुरावस्था झाली असून, दरवाजेही गायब झालेले आहेत आदि समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे परिसरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे. तरी याबाबत आपण तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शिव राष्ट्र पक्षाच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
No comments:
Post a Comment