अनुसूचित जाती-जमातींची कुटुंबे आता स्थिर व्हायला हवीत- सुनंदा पवार
खावटी योजनेचा कर्जतच्या 552 तर जामखेडमधील 458 कुटुंबांना लाभ
नगरी दवंडी/प्रतिनिधीकर्जत ः माता भगिनींनो बस्स झालं पळायचं...आता स्थिर होऊया..आपलं जग बदलूया! आता बदल घडवण्यासाठी तुम्ही दोन पाऊले पुढे या आम्हीही तुमच्यासाठी पुढे येऊ. अनुसूचित जाती-जमातींच्या कुटुंबांतील मुला-मुलींचे शिक्षणाचे प्रश्न असतील तर ते रोहितदादांच्या माध्यमातुन सोडवूया आणि खर्या अर्थाने विकासाला सुरुवात करूया. दुर्लक्षित राहिलेला हा घटक समाजप्रवाहात आणण्यासाठी शासनाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.इतर समाजप्रमाणेच आपली ही कुटुंबे आता स्थिर व्हायला हवीत’ असे प्रतिपादन कर्जतजामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांनी केले.
कर्जत जामखेड येथे अनुसूचित जाती जमातींना खावटी अनुदान योजनेच्या ’अन्नधान्य व किराणा वाटपाच्या शुभारंभ’ कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे, कर्जत तालुका समन्वयक मिलिंद गुंजाळ हे उपस्थित होते. कोरोना विषाणू प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नसलेल्या अनुसुचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी सन 2020-21 या एका वर्षासाठी खावटी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून मतदार संघातील कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यात कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका तथा आ.रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्या हस्ते अन्नधान्य व किराणा किटच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.जामखेड तालुक्यातील एकूण 458 तर कर्जतमधील एकूण 552 लाभार्थ्यांना हे वाटप करण्यात आले.महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ही मदत या कुटुंबांना करण्यात आलेली आहे.लॉकडाऊनमध्ये कामे बंद असल्यामुळे अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी सन 2013-14 पासून बंद असलेली खावटी अनुदान योजना सन 2020-2021 या एका वर्षासाठी सुरू करण्यात आली असुन खावटी अनुदान योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वीच दोन हजार रुपये प्रती कुटुंब अनुदान त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले असुन दोन हजार रुपये किमतीच्या किराणा स्वरूपातील वस्तू वाटप करण्यात आलेल्या आहेत.काही कुटुंबांचे बँक खाते बंद असल्याने त्यांना आर्थिक मदत मिळू शकली नाही परंतु तालुकानिहाय आढावा घेऊन ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. यावेळी कर्जत येथील कार्यक्रमात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, मनीषा सोनमाळी, डॉ शबनम इनामदार, रज्याक झारेकरी, चंद्रकांत बनसोडे, संदीप भिसे, विजय भारती, काकासाहेब ढवळे आदी उपस्थित होते तर जामखेड येथे पार पडलेल्या कार्यकमासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे,दत्ता वारे, सूर्यकांत मोरे, मधुकर राळेभात तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment