पिंपरी जलसेनच्या युवकाचा प्रामाणिकपणा.. ५० हजार रुपये किमतीचा सापडलेला ऐवज केला परत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

पिंपरी जलसेनच्या युवकाचा प्रामाणिकपणा.. ५० हजार रुपये किमतीचा सापडलेला ऐवज केला परत

 पिंपरी जलसेनच्या युवकाचा प्रामाणिकपणा..

५० हजार रुपये किमतीचा सापडलेला ऐवज केला परत




नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील युवक संजय जाधव यांना चिंचोली घाटात सापडला. कॅनॉन कंपनीचा कॅमेरा, विवो कंपनीचा मोबाईल फोन असा सुमारे ५० हजार किमतीच्या वस्तू असणारा ऐवज त्यांनी मोबाईल कव्हर वर असणाऱ्या नंबर वर संपर्क करत या सर्व वस्तू ज्याच्या होत्या त्याला परत केल्या. संजय जाधव यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे पारनेर तालुक्यातून कौतुक होत आहे.पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी त्यांचा सन्मान करून प्रामाणिक पणाबद्दल शाबासकीची थाप पाठीवर टाकली. 

       याबाबत सविस्तर असे की, गेल्या महिनाभरापूर्वी देवीभोयरे येथील शिवसेना शाखाप्रमुख अमोल गजरे यांचा कॅमेरा व मोबाईल पारनेरमधील पूर्णवाद भवन येथील कोव्हीड सेंटरमधून अज्ञाताने उचलून नेला होता. त्यानंतर काल पारनेर च्या गडदवादी-चिंचोली घाटात असणाऱ्या मंदिराच्या जवळ एक दगडामागे एक बॅग पडली असल्याची लघुशंकेसाठी गेलेल्या पिंपरी जलसेन येथील संजय जाधव यांनी पहिली. त्यामुळे त्यांनी ती उघडून पहिली असता त्यामध्ये त्यांना कॅनॉन कंपनीचा कॅमेरा व विव्हो कंपनीचा मोबाइल आढळून आला. मोबाईल च्या पाठीमागे एक मोबाईल नंबर दिसल्याने त्यांनी त्या नंबर वर फोन करून सापडलेल्या वस्तूंची खात्री केली. या सर्व वस्तू देवीभोयरे येथील शिवसेना शाखाप्रमुख अमोल गजरे यांच्या असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी आज गुरुवारी पारनेरमध्ये गजरे यांच्या स्वाधीन केल्या. सुमारे ५० हजारांचा ऐवज असणाऱ्या या सापडलेल्या वस्तू संजय जाधव यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने जाधव यांचे पारनेर तालुक्यातून कौतुक होत आहे. जाधव हे पिंपरी जलसेनचे असून पारनेर येथे त्यांचा सलून व्यवसाय आहे. प्रामाणिकपणे व्यवसायात काम करत असताना सापडलेल्या ५० हजारांच्या वस्तू प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार चंद्रकांत कदम, अमोल गजरे, अमोल ठुबे, ग्रामरोजगर सेवा संघटनेचे तालुकाध्यक्ष माऊली थोरात आदी उपस्थित होते.


प्रामाणिक तरुणांची समाजाला गरज - डॉ श्रीकांत पठारे

आजच्या परिस्थिती मध्ये समाजात प्रामाणिक पणा कमी होत आहे. संजय जाधव यांच्यासारख्या प्रामाणिक तरुणांची समाजाला गरज असल्याचे गौरवोद्गार डॉ श्रीकांत पठारे यांनी काढले.

No comments:

Post a Comment