व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी द्या
मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या
वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी असल्याने निर्बंध शिथील करुन मोची गल्ली, कापड बाजार येथील व्यावसायिकांना कोरोनाचे नियम पाळून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी जुनेद शेख, मयुर सोनग्रा, नवीद शेख, सद्दाम शेख, अदनान शेख, हमजा चुडीवाला आदी उपस्थित होते.
शहरात कोरोना संक्रमणाची साखळी तुटली असून, रुग्णसंख्या कमी झालेली आहे. राज्य सरकारच्या धोरणानूसार कमी रुग्णसंख्या असलेल्या अहमदनगर शहरात निर्बंध शिथील होण्याची गरज आहे. मार्च महिन्यापासून मुख्य बाजारपेठ असलेले मोची गल्ली व कापड बाजार येथील सर्व दुकाने बंद आहेत. यामध्ये व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, येथील दुकानात काम करणार्या नोकर वर्गांच्या कुटुंबीयांचा देखील उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या पावसाळा सुरु झाला असून, नागरिक चप्पल, टोपी, छत्री, बॅग आदी पावसाळ्यासाठी उपयुक्त साधने खरेदी करत असतात. मात्र बाजारपेठ बंद असल्याने नागरिकांची देखील गैरसोय होत आहे. सर्व दुकानदार कोरोनाचे नियम व दिलेली वेळ पाळणार आहे. नुकतेच पुणे शहरात निर्बंध शिथील करुन सर्व बाजारपेठेतील दुकाने नियम पाळून उघडण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment