वैयक्तीक स्वार्थाची भाजप-राष्ट्रवादीची सहमती एक्सप्रेस - किरण काळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 30, 2021

वैयक्तीक स्वार्थाची भाजप-राष्ट्रवादीची सहमती एक्सप्रेस - किरण काळे.

 वैयक्तीक स्वार्थाची भाजप-राष्ट्रवादीची सहमती एक्सप्रेस - किरण काळे.

रखडलेल्या कामांची जंत्री मांडत काँग्रेसने जाहीर केला श्वेतपत्रिका.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापौर,उपमहापौर निवडीच्या राजकीय हालचालींमुळे शहराचे राजकारण एका बाजूला ढवळून निघत असताना काँग्रेसने भाजप, राष्ट्रवादीच्या मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात विकासाच्या केलेल्या दाव्याला आव्हान देत शहरामध्ये रखडलेल्या कामांची जंत्री मांडत श्वेतपत्रिका प्रकाशित केली आहे. श्वेतपत्रिका म्हणजे एखाद्या गोष्टीची खरी स्थिती मांडणे असे आहे. जगामध्ये अनेक देश अशा पद्धतीने जनतेला वस्तुस्थिती समजावी यासाठी सरकारच्या वतीने ती प्रकाशित करत असतात. आम्ही काँग्रेसच्या वतीने नगर शहरातील खर्‍या स्थितीबद्दल महानगरपालिका व नागरिकांचे आणि सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधण्यासाठी ही श्वेतपत्रिका प्रकाशित केली आहे. भाजप, राष्ट्रवादीची शहरातील सहमती एक्सप्रेस ही शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर नसून काही नेत्यांच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी आहे. नगरची जनता अशा प्रकारच्या एक्सप्रेसला विकासाच्या नावाच्या गाजराखाली बळी पडेल असा गैरसमज काही नेत्यांचा झाला आहे, अशी टीका कोणाचे नाव न घेता काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजपने महापौरांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप, भाजपचे खा. सुजय विखे, माजी आ.शिवाजी कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रेझेंटेशनचे सादरीकरण करत नगर शहराचा अडीच वर्षांमध्ये भरघोस विकास करण्याचा दावा करण्यात आला होता. त्याचबरोबर भाजपचे सर्वोच्च नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात स्क्रीन वर सुरू असताना राष्ट्रवादीच्या आमदारांचे भाषण सुरू करत मन की बातचा आवाज म्युट केल्यामुळे पंतप्रधानांपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार मोठे आहेत का अशी कुजबूज भाजप कार्यकर्त्यांमध्ये सभागृहात घडली होती. त्यातच आता काँग्रेसने भाजप राष्ट्रवादीवर हल्ला केल्यामुळे नवीन राजकीय विषयाला तोंड फुटले आहे.
शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयामध्ये या श्वेतपत्रिकेचे महानगरपालिका आणि नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी प्रकाशन केले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, खजिनदार मोहन वाखुरे, सहसचिव गणेश खापरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
श्वेतपत्रिकेत काँग्रेसने शहराच्या दुरावस्थेचे नागरी प्रश्नांबाबतीमध्ये उपस्थित केलेले मुद्दे पुढीलप्रमाणे - नगर शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे तेच नागरिकांना समजेनासे झाले आहे, तपोवन रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांची फसवणूक झालेली आहे. शहरातील सर्व रस्त्यांची कामे अशाच पद्धतीने निकृष्ट झाली असल्यामुळे एकाच पावसामध्ये सदर कामे पावसाच्या पाण्यात वाहून जातात हा कायमच अनुभव नगरकरांना आहे, भुयारी गटार योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, अमृत पाणी योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, नागरिकांना आजही दिवसाआड पाणी मिळते आणि अनेक ठिकाणी हेच प्रमाण तीन ते चार दिवसांचे आहे. तसेच पाणी पूर्ण दाबाने मिळत नाही. मैलामिश्रित पाणी अनेक वेळेला लोकांना पुरविले जाते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, अजूनही घंटागाड्या शहराच्या सर्व भागांमध्ये पोहोचत नाहीत, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे झालेली नाहीत. यामुळे नागरिकांच्या घरात दरवर्षीप्रमाणे पाणी शिरणार आहे, ओढे, नाल्यांमध्ये बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी राजकीय वरदहस्त यामुळे, महानगरपालिकेच्या पाठबळामुळे अतिक्रमण झाले आहे. यामुळे शहराच्या सांडपाणी व्यवस्थापणाच्या नैसर्गिक रचनेवर घाला घालण्याचे काम मनपाने केले आहे, हॉकर्स झोन / फेरीवाला संरक्षण कायद्याची अंमलबजावणी शहरात झालेली नाही. यामुळे भाजीवाले, फेरीवाले फळवाले अशा छोट्या घटकातील लोकांना महापालिका अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली सतत वेठीस धरत असते. त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, नेहरू मार्केटची पूनरउभारणी अद्याप होऊ शकलेली नाही, प्रोफेसर कॉलनी संकुलाचा प्रश्न निकाली काढता आलेला नाही, सावेडीतील नाट्यगृहाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, नगर शहराचा उपनगरांमध्ये झालेला विकास लक्षात घेता सावेडी मध्ये स्वतंत्र स्मशानभूमीची गरज आहे. त्याचाही प्रश्न प्रलंबित आहे, विविध कामांच्या नावाखाली शहरांमध्ये नियोजनशून्य पद्धतीने काम सुरू असल्यामुळे जागोजागी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चिखल साचला असून लोकांना रस्त्याने जीव मुठीत धरून वावरावे लागते,  खेळांसाठी क्रीडांगणे विकसित करण्यात अपयश आले आहे, झोपडपट्ट्या असणार्‍या परिसरांचा कोणत्याही प्रकारचा विकास करू शकलेले नाहीत, मनपाच्या शाळांची दुरावस्था झालेली आहे, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणारी सिटीबसची दैना पाहता नगरकरांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा यातून देण्यामध्ये मनपा सपशेल फेल ठरली आहे, शहरामध्ये कुठेही सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असणारी शौचालय दुर्गंधीमुळे वापरासाठी योग्य नाहीत, मनपाला स्वतःचे हॉस्पिटल उभारता येऊ शकलेले नाही, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची अवस्था असून नसल्यासारखी झालेली आहे, मनपाचे हॉस्पिटल नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाच्या संकट काळामध्ये आरोग्यसुविधा, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे मनपाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. यामुळे शहरातील हजारो कुटुंबांना कधीही भरून न येणारा फटका यातून बसला आहे, नगर शहरातील अजूनही बहुतांशी भाग हा स्ट्रीट लाईट अभावी अंधारात आहे. असलेल्या स्ट्रीट लाईट पैकी अनेक  लाईट हे आजही चालू अवस्थेत नाहीत, डीपी रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत.

No comments:

Post a Comment