शहराच्या पर्यटन विकासासाठी ‘नगर जल्लोष’चे पालकमंत्र्यांना साकडे
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहर ही ऐतिहासिक नगरी असून, या शहराला सुमारे 531 वर्षांचा इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. नगर शहरामध्ये 70हून अधिक ऐतिहासिक वास्तु आहेत. नगर शहर हे महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात ये-जा करणार्यांची व नगर शहरातून जाणार्यांची संख्या दैनंदिन वाढते आहे. नगर शहरात पर्यटन विकासाला मोठी संधी असून, पर्यटन विकासाला चालना मिळाल्यास शहराची भरभराट होईल. यासाठी नगर जल्लोष ट्रस्टने नगरच्या पर्यटन विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबतचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रिफ यांना दिले आहे. या निवेदनात विविध विषय सुचविण्यात आले आहेत. याबाबत ना. मुश्रिफ यांना ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी उद्योजक जितेंद्र तोरणे, अजय म्याना, राहुल सप्रे, राकेश बोगा, योगेश ताटी, सचिन बोगा, इरफान शेख, विराज म्याना, अक्षय हराळे, बालाजी वल्लाल, पंकज मेहेर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी नगर शहराच्या पर्यटन विकासासाठी पालकमंत्री ना. मुश्रिफ यांना साकडे घातले. नगर जल्लोष ट्रस्टच्या वतीने खालील बाबींकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. साप्ताहिक सुट्टीत नगर दर्शन बससेवा सुरू करणे, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे जतन व संवर्धन करणे, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिन्यातून एकदा आढावा बैठक घेणे, पर्यटनमंत्री यांचा नगरच्या पर्यटनासाठी दौरा निश्चित करावा, नगर दर्शनमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. यांसह इतर विषयांकडे पालकमंत्री ना. मुश्रिफ यांचे लक्ष वेधले असून, त्यांनी जातीने नगर पर्यटन विकासासंदर्भात लक्ष घालण्याबरोबरच पर्यटन विकासासाठी राज्य शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment