राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या आढावा बैठकीत अल्पसंख्यांक समाजातील युवकांच्या प्रश्नावर चर्चा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या आढावा बैठकीत अल्पसंख्यांक समाजातील युवकांच्या प्रश्नावर चर्चा

 राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या आढावा बैठकीत अल्पसंख्यांक समाजातील युवकांच्या प्रश्नावर चर्चा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना काळात राष्ट्रवादी पक्षाने कोणतेही राजकारण न करता शंभर टक्के समाजकारण करुन सर्वसामान्य जनतेला आधार दिला. अल्पसंख्यांक समाजाच्या मदतीसाठी राष्ट्रवादी पक्ष धावून आला. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना अल्पसंख्यांक समाजा पर्यंत घेऊन गेल्यास पक्षाची विचारधारा त्यांच्या पर्यंत पोहचणार आहे. अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालय व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. शरद पवार यांच्या पुढाकाराने झाली. राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक विभाग दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांनी केले
उत्तर महाराष्ट्राच्या दौर्यावर असलेले हबीब अहमदनगर शहरात आले असता, शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते इरशाद जहागीरदार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, मुन्नाशेठ चमडेवाले, अलाउद्दीन दादाजी, इम्तियाज पाशा, वसिम शेख, सोफियान शेख, सिध्दार्थ आढाव, अब्दुल खोकर, शाहरुक शेख, अनस शेख, निलेश इंगळे, अन्वर शेख, दिलावर शेख, मोबीन सय्यद, नदिम शेख, जुबेर पठाण आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना हबीब म्हणाले की, अल्पसंख्यांक समाज पक्षाशी जोडण्यासाठी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. प्रत्येक जिल्ह्यात आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात येत आहे. हा दौरा अधिकृत असून, काही विरोधक समाज माध्यमामधून चुकीचा संदेश पसरवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे स्पष्ट केले. तसेच कोरोना काळात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले असून, त्यांच्या भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबीर घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकात साहेबान जहागीरदार यांनी अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष हा आघाडीचा पक्ष आहे. साखर सम्राटांच्या जिल्ह्यात व शहरात शिवसेनेचे वर्चस्व असताना राष्ट्रवादी पक्षाने आघाडी घेतली. शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचे बळकटीकरण झाले असून, मोठ्या संख्येने युवा वर्ग पक्षाशी जोडला गेला आहे. दोनदा महापौर व आमदार राहिलेले जगताप यांना मंत्रीमंडळात स्थान देऊन शहराचा अधिक विकास साधण्याची संधी उपलब्ध करुन देण्याचे सांगितले. प्रा.माणिक विधाते यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात कार्यकर्ता म्हणून कार्य केले. आमदार अरुणकाका जगताप व संग्राम जगताप यांनी दिलेल्या शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळताना पक्षाला अनेक कार्यकर्ते जोडण्याचे काम केले. दोन्ही आमदारांच्या माध्यमातून शहरात राष्ट्रवादी पक्ष जनेतेच्या घराघरात पोहचला आहे. जनेतेने दाखवलेल्या विश्वासाची परतफेड करण्यासाठी पक्षाने आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपदाची संधी देण्याचे विचार त्यांनी मांडले. इरशाद जहागीरदार यांनी साहेबान जहागीरदार यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांना जिल्हा व राज्यावर काम करण्याची संधी देण्याचे सुचवले. कोरोनाने मृत झालेल्या मृतदेहावर साहेबान जहागीरदार यांनी निस्वार्थ भावनेने सर्व धर्मियांच्या अंत्यविधीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल व गरजू घटकातील नागरिकांना कोरोनाच्या संकटकाळात केलेल्या मदतीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी जहागीरदार यांना अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्याची एकमुखी मागणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोफियान शेख यांनी केले. आभार शहानवाझ शेख यांनी मानले.

No comments:

Post a Comment