शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा- महसूल मंत्री थोरात
नामदार थोरातांनी घेतला जिल्हा काँग्रेसचा आढावा
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः काँग्रेस पक्षाने कायम गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले असून पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर चांगले काम करताना शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा कोरोना परिस्थिती, बी -बियाणे उपलब्धता, त्याचे वाटप व इतर प्रश्नांवर आढावा घेतला
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ऑनलाईन बैठकीत त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार लहू कानडे ,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राजेंद्र दादा नागवडे ,करण ससाने ,सचिन गुजर ,उत्कर्षा रुपवते, शहराध्यक्ष किरण काळे ,सुरेश थोरात, मधुकरराव नवले, समन्वयक ज्ञानदेव वाफारे ,नासिर शेख ,अरुण नाईक, बाबासाहेब ओहोळ ,ज्ञानेश्वर मुटकुळे, सचिन चौगुले, शिवाजी नेहे ,किरण पाटील, बाळासाहेब आढाव, तुषार पोटे, दिपक भोसले ,संभाजी रोहोकले, अॅड. कैलास शेवाळे, शहाजीराजे भोसले, राहुल उगले, अमोल फडके ,कार्लोस साठे, आदींसह जिल्ह्यातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते.. यावेळी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी तालुकानिहाय कोरोना परिस्थिती उपाययोजना, बी बियाणे पुरवठा आदींबाबत आढावा घेतला
याप्रसंगी मार्गदर्शन करताना नामदार थोरात म्हणाले की, अहमदनगर जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे .काँग्रेसने कायम सर्वसामान्य व गोरगरिबांच्या हिताचे राजकारण केले आहे. हा पक्ष लोकशाही मानणारा व राज्यघटनेचा विचार जपणारा पक्ष आहे .देशाच्या एकात्मतेसाठी काँग्रेसचा मोठा त्याग असून या पक्षाचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी संघटनात्मक वाढ अधिक होणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षात तरुणांना मोठी संधी असून शासनाच्या विविध योजना योग्य लाभार्थींपर्यत पोहोचवताना दुवा म्हणून आपण काम करावे. कोरोनाच्या संकटात सर्व तालुक्यातील पदाधिकारी, युवा कार्यकर्ते यांनी अतिशय चांगले काम केले आहे. विविध ठिकाणी कोवीड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना मोठी मदत केली आहे. म्बुलन्स सुविधा दवाखान्यांमध्ये बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन उपलब्ध करून देणे अशा कामी स्वयंसेवकांचे काम अत्यंत कौतुकास्पद राहिले आहे .कोणत्याही संकटाचा सामना हा संघटना मजबूत असेल तर चांगल्या पद्धतीने करता येतो. आगामी काळामध्ये जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष अधिक सक्षम करताना देशात काँग्रेसला बळकटी देण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेतकर्यांचे बी-बियाणं साठी होणार्या अडचणी दूर करण्यासाठी व आपले गाव आपला तालुका कोरोना मुक्त होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष अत्यंत समृद्ध परंपरा असलेला पक्ष आहे .हा पक्ष गोरगरिबांच्या पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षांमध्ये अधिक बांधणी करताना संघटनात्मक पातळीवर दलित मागासवर्गीय व विविध समाजातील लोकांना सामावून घेत त्यांनाही संधी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे तर आ.लहू कानडे म्हणाले की, आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील वंचित घटकांना न्याय देत शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे
तर करण ससाणे म्हणाले की, असंघटित कामगार, बांधकाम क्षेत्रातील मजूर यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.यावेळी उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की, कोरोना संकटामध्ये ज्या मुलांचे आई-वडील मृत पावलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना पर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम करावे तर राजेंद्र नागवडे म्हणाले की, जिल्हा पातळीवर पक्ष संघटना मजबूत करून पुन्हा अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसला वैभव मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने काम करावे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, समन्वय ज्ञानदेव वाफारे, सचिन गुजर, किरण काळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यातील विविध सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment