जिल्हावासियांनी नियम पाळल्यास कोरोना आटोक्यात : डॉ. भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

जिल्हावासियांनी नियम पाळल्यास कोरोना आटोक्यात : डॉ. भोसले

 जिल्हावासियांनी नियम पाळल्यास कोरोना आटोक्यात : डॉ. भोसले

दुसर्‍या आठवड्यातही जिल्हा प्रथम स्तरामध्येच


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील या आठवड्यातील (दिनांक 4 ते 10 जून) बाधित रुग्णदर हा 2.63 टक्के आणि ऑक्सीजन बेडसची उपलब्धता आणि प्रत्यक्ष ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्येचा दर हा 12.77 टक्के इतका असल्याने अहमदनगर जिल्ह्याचा स्तर 1 मध्येच समावेश करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने दिनांक 06 जून 2021 रोजी जारी केलेले आदेशच लागू राहतील,असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या-त्या भागासाठी आस्थापना बंदच्या वेळासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे.  जिल्हावासियांनी नियमांचे पालन केल्यास आपण जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव नक्की संपुष्टात आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोरोना उपाययोजना संदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जयश्री आव्हाड, रोहिणी नर्‍हे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे, हे जिल्हा मुख्यालय तर तालुका स्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
राज्य शासनाने दिनांक 4 ते 10 जून दरम्यानचा रुग्णबाधित दर आणि ऑक्सीजन बेडस उपलब्धता यावर जिल्हांचे स्तर ठरविले आहेत. त्यात अहमदनगर जिल्हा प्रथम स्तर मध्ये असल्याने आपल्याकडे यापूर्वीच दिनांक 06 जून रोजी जारी केलेले आदेश कायम राहतील. नव्याने कोणतेही आदेश जारी करण्यात आलेले नाहीत, असे  जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. मात्र, निर्बंध शिथील झाल्याने जिल्ह्यात काही नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात तसेच ग्रामीणभागातही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विनामास्क फिरतानाही काही नागरिक दिसत आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी तेथील व्यापारी, उद्योजक आस्थापनांच्या प्रमुखांशी चर्चा करुन त्या-त्या शहरांसाठी दुकाने सुरु आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करावी. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले. कमी चाचण्या होणार्‍या नगरपालिका अथवा ग्रामीण रुग्णालयांनाही चाचण्या वाढविण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणांनी पथके नेमून कारवाई करावी. ज्याठिकाणी अशा नियमांचे उल्लंघन होत असलेले दिसेल, तेथे तात्काळ कारवाई करावी. कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनांच्या चालकांनीही त्यांच्या दुकानात येणारे ग्राहक अथवा दुकानात काम करणारे कामगार कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत असल्याबाबत खात्री करावी.

No comments:

Post a Comment