जपानी कंपन्यांच्या उद्योग उभारणीमुळे तरुणांना रोजगार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 29, 2021

जपानी कंपन्यांच्या उद्योग उभारणीमुळे तरुणांना रोजगार.

 जपानी कंपन्यांच्या उद्योग उभारणीमुळे तरुणांना रोजगार.

सुपा एमआयडीसीतील गुंडगिरी व दहशतवाद संपुष्टात..


सुपा -
पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी मधील गुंडगिरी, दहशतवादाच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलल्यामुळे हा औद्योगिक परिसर भयमुक्त झाला आहे. जपानी उद्योजकांनी याची दखल घेवून या परिसरात उद्योग उभारणीसाठी पावले उचलली आहेत. “मित्सुबशी बेलटिंग इंडिया” ही कंपनी सुपा एमआयडीसी तील 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यांनी यासाठी 20 एकर जागेचा ताबा घेतला आहे. मित्सुबशी बेलटिंग पाठोपाठ आणखी दोन जपानी कंपन्याही येथे येणार आहेत. आयडियल प्लास्टो या जपानी कंपनीसह आणखी एका तिसर्‍या कंपनीनेही जागेसाठी सुपा एमआयडीसीकडे प्रस्ताव सादर केला आहे. विस्तारित सुपा एमआयडीसीमध्ये नव्याने आलेल्या जपानी कंपन्यांचे स्वागत आहे. या कारखान्यांना लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांच्याबाबत गुंडगिरी व कुणाचीही दहशत खपवून घेतली जाणार नाही. असा इशारा आमदार निलेश लंके यांनी दिला आहे.
बर्‍याच कालावधीनंतर पारनेर तालुक्याच्या सुपा एमआयडीसीतील जपानी पार्कमध्ये पहिल्या कंपनीची एंट्री झाली आहे. मित्सुबशी बेलटिंग इंडिया हा जपानी उद्योग 300 कोटी रुपयांची येथे गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी 20 एकर जागेचा ताबा 23 जून रोजी घेतल्याची माहिती एमआयडीसीचे भूसंपादन अधिकारी रमेश बेल्हेकर यांनी दिली. आतापर्यंत सुप्याच्या विस्तारित एमआयडीसीमध्ये मिंडा, कॅरिअर मायडिया, केएसपीजी या तीन मोठ्या कंपन्या आल्या आहेत. त्यांच्या उत्पादन प्रक्रिया सुरू झाल्या आणि बर्‍याच तरुणांच्या हाताला स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला. विस्तारित सुपा एमआयडीसीमध्ये जपानी पार्कसाठी स्वातंत्रपणे 210 एकर क्षेत्र राखीव ठेवण्यात आल्याची माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली.
परंतु, जपानी उद्योग न आल्याने ही जागा तशीच पडून होती. जपानी उद्योजकांनी यापूर्वी अनेक वेळा भेटी देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक परिस्थितीबाबत मिळालेल्या माहितीने जपानी उद्योजकांनी सुप्याकडे कानाडोळा केल्याचेही समजले. मध्यंतरी नवीन कारखान्यांच्या प्रशासनाला झालेला त्रास, गुंडगिरी, ठेकेदारीच्या कामावरून झालेले वाद, संघर्ष यामुळे जपानी उद्योजकांनी पाठ फिरवली होती. नंतरच्या काळात थेट वरिष्ठ पातळीवरून याची दखल घेतली गेली. पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घातले व गुंडगिरी, दहशत यांचा बीमोड करण्यासाठी पावले उचलली. त्यानंतर निर्भय वातावरण तयार झाल्याने आणि कंपन्या व स्थानिक नागरिक यांच्यातील विसंवादाची जागा संवादाने घेतल्याने आता जपानी कंपन्या येथे येण्याबाबत अनुकूल झाल्या. परिणामी मित्सुबशी बेलटिंग इंडिया ही जपानी कंपनी 300 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी 20 एकर जागेचा ताबा त्यांनी घेतला आहे. या कारखान्याच्या उत्पादन प्रक्रियेस सुरुवात होण्यास जवळपास दोन वर्षे लागतील. या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज रिलेटेड या कारखान्यात दुचाकी व चारचाकी वाहनास लागणारे रबरी बेल्ट तयार होणार असल्याची माहिती कारखान्याचे सिनिअर जनरल मॅनेजर बाहुबली मक्कनवार यांनी दिली.

No comments:

Post a Comment