खा. सुजय विखेंच्या आरोपांना ना. तनपुरेंनी दिल प्रत्युत्तर.
साहेब, हे वागणं बरं नव्हं!
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
राहुरी ः कोरोनाची लाट ओसरत असताना खा. सुजय विखेंनी राहुरीत येऊन “तुम्ही वाड्यावर बसून हस्तक्षेप का करता? अशी लसीकरणावरून टीका केली. या टीकेला.ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी खासदार साहेब. हे वागणं बरं नव्हे. असं सांगत झूम अॅपद्वारे पत्रकारांशी संवाद साधत खासदार डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या आरोपांबाबत उत्तरे दिली.
कोरोनाच्या जीव घेण्या संकट काळात खासदार डॉ. सुजय विखे यांनी काही कार्यकर्त्यांच्या बोलण्यावरून राहुरीत येऊन खोटे नाटे आरोप करणे हे मुळीच पटले नाही. राहुरीकरांनी मोठे मताधिक्य देऊनही खासदार विखे हे कोरोनाची भयावह लाट ओसरत असताना राहुरीत आले. किमान राहुरीत आले हे समाधानकारक असताना त्यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्देवी असल्याचे ते म्हणाले.
ना. तनपुरे पुढे म्हणाले की, राज्याला लस पुरवठा करण्याची जबाबदारी ही नक्कीच केंद्राची होती. केंद्र शासनानेच भारत बायोटेक व सिरम कंपनीची लस पाठविली. परंतु, केंद्राकडून किती प्रमाणात लस पुरवठा झाला. लोकसंख्या पाहता तुटपुंज्या प्रमाणात लस आरोग्य प्रशासनाला मिळत होती. त्यामुळे आरोग्य विभागावर संकट निर्माण झाले होते. शेकडोंच्या प्रमाणात लस येत असताना हजारोंच्या संख्येने नागरिक गर्दी करीत होते. अशावेळी लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी म्हणून नियोजन करणे माझे कर्तव्य होते. केंद्र व राज्याच्या निधीचे भांडण करण्यापेक्षा लोकांचे जीव वाचविण्याला महत्व होते. खासदार डॉ. सुजय विखे हे कोरोना लाट कमी झाल्यानंतर राहुरीत दाखल झाले. ते राहुरीत आल्याचे समाधान असले तरीही त्यांनी केलेले राजकारण हे संकट काळात न पटण्यासारखे आहे असेही ते म्हणाले. अधिकार्यांवर दबाव आणणे व कोरोना लसीकरण केंद्रावर राजकारण करणे हा प्रकार राहुरीत कोठेही घडला नाही. खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी येथील लसीकरण केंद्रावर जाणे गरजेचे होते. त्यांना सत्यता कळाली असती. जिल्ह्यात सर्वाधिक चांगल्या पद्धतीचे लसीकरण राहुरीत होत आहे. जिल्ह्यामध्ये राहुरीच्या पॅटर्नचा अवलंब करण्यात आला. याची माहिती खासदार डॉ. विखे यांना नसावी. त्यामुळेच त्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या खोट्या माहितीमुळे माझ्यावर खालच्या पातळीचे आरोप केले आहे. कोरोनाच्या या संकट काळात राजकारण कोणीही करू नये अशी माझी भावना होती. परंतु माझ्यावर खोटे आरोप झाल्याने पत्रकार परिषद घेत मला उत्तर द्यावे लागल्याचे राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment