योजनांचा लाभ घेऊन स्वत:चे आयुष्य सुरक्षित करावे - विनोद कुमार
भारतीय स्टेट बँकेच्यावतीने छोट्या व्यवसायिकांना 10 हजार कर्जाचे वितरण
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम फेरीवाले, छोटे विक्रेते यांच्यावर झाला आहे. त्यामुळे त्यांचा रोजगार ठप्प झाला होता. त्यांच्या व्यवसायाला नवी उभारी देण्यासाठी व जास्तीत जास्त पात्र आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत भारतीय स्टेट बँकेच्या योजनेंतर्गत कर्ज पोहचावे म्हणून नगरच्या मुख्य शाखेच्यावतीने पी.एम.स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज मंजुरी व वाटप या मेळाव्यांतर्गत कर्ज वितरण करण्यात आले आहे. दिलेल्या कर्जाचे योग्यप्रकारे नियोजनपुर्वक वापर करुन स्वत:चा व्यवसाय पुनर्जिवित करावा तसेच वेळेवर कर्ज परत फेड करुन बँकेमध्ये स्वत:ची पत निर्माण करावी. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना व अटल पेन्शन योजना या सरकारी योजनांचा लाभ घेऊन स्वत:चे आयुष्य सुरक्षित करावे, असे प्रतिपादन बँकेचे क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक विनोद कुमार यांनी केले.
भारतीय स्टेट बँकेच्या अहमदनगर क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने महानगर-पालिका व नगरपालिका क्षेत्रातील फेरीवाले, फळ, भाजीपाला विक्रेते यांना रुपये दहा हजार इतके कर्ज केंद्र सरकारच्या पी.एम. स्वनिधी योजनेंतर्गत वितरीत करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक विनोद कुमार, मुख्य प्रबंधक अजय कुमार, उप प्रबंधक प्रविण दळवी, क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य प्रबंधक श्रीराज शेवाळे, प्रबंधक रविंद्र बेहेरे, उपप्रबंधक सुदीप प्रसाद, धनाजी भागवत, विकास निकाळजे व ग्राहक सेवा केंद्र चालक नवनाथ सगम, अमोल जवणे, जयदीप पादीर आदि उपस्थित होते. प्रारंभी अजय कुमार यांनी या योजनांचे माहिती उपस्थितांना देऊन बँकेच्यावतीने छोट्या व्यवसायिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. या मेळाव्यास व्यवसायिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी उपस्थित व्यवसायिकांनी या कर्जामुळे व्यवसायाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना बोलून दाखवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल प्रविण दळवी यांनी केले तर नवनाथ सगम यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment