अहिल्याबाई होळकर यांना मखदुम सोसायटीच्यावतीने अभिवादन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहिल्याबाई होळकर यांच्या आपल्या कर्तृत्वाने रणांगणे तर गाजवलीच परंतु त्याचबरोबर लोकोपयोगी कार्य करुन आपल्या प्रजेप्रती असलेले प्रेम दिसून येते. त्यांनी निर्माण केलेले अन्नछत्र, नदीवरील घाट, तलाव, बारवे, विहिरी या माध्यमातून प्रजेला सुविधा उपलब्ध करुन दिल्या. त्याचप्रमाणे अंधश्रद्धेविरुद्ध उभे राहून सती जाण्याच्या रितीला शास्त्रीय आधार नसल्याचे दाखवून अनेक विधवांचे प्राण वाचवून त्यांना आधार दिला. एक स्त्री कसा आदर्श राज्य कारभार करु शकते, असे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर होय, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले.
मखदुम एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटीच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष आबीद दुलेखान, रुग्णमित्र नादीर खान, मुस्कान वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, अबरार शेख आदि उपस्थित होते.
याप्रसंगी नादीर खान म्हणाले, आज राष्ट्रासाठी बलिदान देणार्या व्यक्तीमत्वांच्या विचारांची गरज आहे. अहिल्याबाई होळकर यांनी आपले आयुष्य प्रजेचे रक्षण आणि त्यांच्या हित जोपासण्यात घालविले. आज कोरोना काळात त्यांच्या विचाराने काम करुन समाजाला दिलासा देण्याची गरज असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment