जिल्ह्याला अतिरिक्त पोलिस बळाची गरज - पोलीस अधीक्षक
नव्या पाच पोलिस ठाण्यांची गरज..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यामध्ये पाच पोलीस ठाण्यांचा प्राथमिक स्तरावरचा प्रस्ताव आहे. यामध्ये पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या पोलीस ठाण्याला मंजुरी देण्यात आलेली असून, त्याचे फक्त नोटिफिकेशन बाकी आहे. जिल्ह्यामध्ये सध्या तरी तीन पोलीस स्टेशन व्हावे, यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे.
यामध्ये कर्जत तालुक्यातील मिरजगाव, जामखेड तालुक्यातील खर्डा व नगर शहरातील केडगाव यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
नगर जिल्हा भौगोलिकदृष्टया मोठा असल्यामुळे काही भागांमध्ये नव्याने पोलीस स्टेशन होण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने राहुरी, शेवगाव व पाथर्डी या तालुक्यांमध्ये नव्याने पोलीस स्टेशन करावे लागणार आहे. त्यासाठी आम्ही माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी पोलीस स्टेशन सुरू करता येईल की, आहे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची कार्यक्षमता वाढवून त्याठिकाणी उत्तर-दक्षिण असा भाग करून कामाचे विभाजन करण्याबाबत विचार सुरू आहे. प्राथमिक स्तरावर काही ठिकाणी चौक्या उभ्या करण्याचाही विचार करावा लागणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. नगर जिल्हा पोलीस प्रशासनात ‘ई-टपाल’ सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे कामकाजात गतिमानता येईल. तसेच लोकसेवा अधिनियमाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वेळेत सेवा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल. या यंत्रणेत दोन हजार कर्मचारी, अधिकाऱयांचा समावेश करण्यात आला असून, कोणत्या कर्मचाऱयाकडे कोणते व किती टपाल प्रलंबित आहेत, याची माहिती आता एका क्लिकवर वरिष्ठांना मिळणार आहे. टपाल गहाळ होण्याचे प्रकार यामुळे रोखता येणार असून या सेवेसाठी आमदार रोहित पवार यांच्यामार्फत संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असेही पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात नव्याने पाच पोलीस ठाणे निर्माण करण्याची गरज असून, सध्या तीन पोलीस ठाणी निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले उचलली आहेत. याशिवाय जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बळ लागणार आहे. त्यासाठी नव्याने पोलीस कर्मचारी मिळावेत, यासाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले.
अवैध धंदे रोखण्यासाठी चार विशेष पथके
कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळा व मंदिरे वगळता सर्व व्यवहार आता सुरळीतपणे सुरू झाले आहेत. तसेच, जिल्हाबंदी उठल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही सुरळीत झाली आहे. मात्र, हे होत असतानाच जिल्ह्यामध्ये सध्या भुरटया चोऱया, लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच मागील आठवडयात अवैध वाळूव्यवसायाच्याही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. या अवैध धंद्यांना आळा बसविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चार पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत.
No comments:
Post a Comment