माथाडी कामगारांसंदर्भात ठेकेदारांकडून जिल्हाधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्तांची दिशाभूल
रेल्वे मालधक्क्यावर भेट देऊन पाहणी करण्याची माथाडी कामगारांची मागणी
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जागतिक कोरोना महामारीच्या संकटकाळात अनेकजण आपले काम इमानेएतबारे करीत आहेत. त्यांच्यासारखेच अत्यावश्यक सेवेत काम करणारे माथाडी कामगार कोरोना योद्धे म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत. विविध क्षेत्रात काम करणार्यांना सुरक्षा कवच आहे. मात्र, रेल्वे मालधक्क्यावर काम करणार्या माथाडी कामगारांना कुठलेही सुरक्षा कवच नाही. ठेकेदार (हुंडेकरी) यांच्याकडून माथाडी कामगारांबाबत प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे. सकाळी 8.30 ते सायं. 6.30 पर्यंतची कामाची वेळ असताना रात्री 8 वाजेपर्यंत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणार्या कष्टकरी, गोरगरीब माथाडी कामगारांना कोणीही वाली राहिलेला नाही. गहू, खत व सिमेंटच्या गाडया चढ-उतार करण्याचे काम आम्ही करतो. आम्हाला कोरोना सुरक्षा कवच मिळावे, तसेच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याची आमची मागणी आहे, असे रेल्वे मालधक्का माथाडी कामगार मुकादम विलास उबाळे यांनी सांगितले.
याप्रसंगी रेल्वे मालधक्का माथाडी कामगार मुकादम पोपट लोंढे, गणेश कंदूर, सुरेश निरभवणे, गणेश जाधव, भगवान शेंडे, विलास गुंड, रोहिदास भालेराव, प्रशांत गायकवाड, दत्तात्रय अनवणे, मधुकर पाटोळे, शरद वाघचौरे, वसंत पेटारे, बळीराम शेंडे, दीपक रोकडे, सागर पोळ, संभाजी कोतकर, पंडित झेंडे, संजय पाडळे, संजय शिरोळे यांच्यासह माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हुंडेकरी (ठेकेदार) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देऊन माथाडी कामगारांविषयी दिशाभूल करण्याचे काम केले आहे. सिमेंट गोण्या वाहण्याचे काम अत्यावश्यक सेवेत मोडत नाही. मात्र, हुंडेकरी यांच्या आग्रहाखातर त्यांचे काम करीत आहोत. कामगार लोकांच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे कामकाज ठप्प होत असल्याचा आरोप हुंडेकरी विनाकारण हेतूपुरस्सर करतात. हे सर्व आरोप निराधार असून, आम्ही ते फेटाळून लावतो. येथे भेट दिल्यावर सत्य परिस्थितीची जाणीव होईल. माथाडी कामगार रेल्वे मालधक्क्यावर प्रामाणिकपणे ते आपली सेवा बजावत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
कोरोना योद्धे ज्याप्रमाणे जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडतात. आमचे काम अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने कोरोनाचा काळ असून देखील आम्ही काम चोखपणे करीत आहोत. कामासंदर्भात काही अडचणी असल्यास माथाडी कामगार, सहाय्यक कामगार आयुक्त व हुंडेकरी (ठेकेदार) यांच्यात वेळोवेळी चर्चा होते. या ठिकाणी हुंडेकरी नेहमीच खोटेनाटे आरोप करतात. अधिकार्यांची दिशाभूल करून त्यांना चुकीची माहिती दिली जाते. माथाडी कामगारांना बदनाम करण्याचे काम हुंडेकरी करीत आहेत. त्यांचे आरोप निराधार व खोटे आहेत. याचा आम्ही सर्व माथाडी कामगार बंधू निषेध करतो. कोरोनाच्या या संकटकाळास आता जवळजवळ सव्वा वर्ष होत आले आहे. मात्र, आम्ही कधीही या काळात कामात चालढकल केली नाही. आमचे काम आम्ही केले, असे श्री. उबाळे यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment