महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला स्वीकारलं - शरद पवार.
आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार असल्याची ग्वाही; विधानसभा व लोकसभा शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार.
मुंबई - ’तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले, आम्ही कधी शिवसेनेसोबत काम केलं नव्हतं. पण, शिवसेना हा विश्वास ठेवणारा पक्ष आहे, त्यांच्यामुळे काँग्रेस सुद्धासोबत आली. आणि महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला स्विकारलं, देशानंही स्विकारलं. महाविकास आघाडी सरकार हे भक्कम असून पाच वर्ष टिकेल आणि आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करेल, असं स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्या चालू असलेल्या मोदी-ठाकरे भेटीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने बोलत असताना शरद पवार यांनी आगामी काळातील राजकारणाची दिशा काय असेल याचे संकेत दिले.
श्री शरद पवार पुढे म्हणाले की, ’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर एकांतात मोदींनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, असं माझ्या वाचण्यात आलं. त्यानंतर अनेक जण तर्कवितर्क लढवत आहे. पण, शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही. महाराष्ट्र शिवसेनेला खूप वर्षांपासून पाहत आहे. माझा पूर्वीचा अनुभवानुसार, हा विश्वासाचा पक्ष आहे. यावेळी शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत किस्सा सांगितला ’ जेव्हा जनता पक्षाचे सरकार आले होते. तेव्हा काँग्रेसचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना हा पक्ष पुढे आला होता. तो नुसता पुढे आला नाही तर धोरणात्मक निर्णय घेत इंदिरा गांधी यांना मदत करण्यासाठी एक सुद्धा उमेदवार उभा केला नव्हता. विधानसभा निवडणुकीत एखादा पक्ष उमेदवारच उभा करणार नाही, यापेक्षा मोठा निर्णय काय असू शकतो. त्याची चिंता बाळासाहेबांनी कधी केला नाही. इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता तो बाळासाहेबांनी पाळला. हा इतिहास काही विसरता येणार नाही. त्यामुळे कुणी काहीही शंका घेत असतील तर शिवसेनेनं त्या कालखंडात जी भूमिका घेतली होती ते पाहता, काही जण काहीही आखाडे बांधत असतील तर ते वेगळ्या वळणाचे आहे, हे सरकार पाच वर्ष टिकेल’, असं पवारांनी ठणकावून सांगितलं. ’तुमच्या मागे जो सामान्य माणूस आहे. त्याच्याशी बांधिलकी जपा. आपले अनेक सहकारी सोडून गेले, पण तरीही राष्ट्रवादीने आपली सत्ता स्थापन केली आणि राज्यात नेतृत्व करण्याची फळी निर्माण केली. राजकारण सांभाळण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. सत्ताही महत्त्वाची आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताही महत्त्वाची आहे, असंही पवार म्हणाले.
No comments:
Post a Comment