फेज-2 कामासाठी खोदलेला रस्ता अखेर नगरसेवक त्र्यंबके यांनी बुजविला
मनपा व ठेकेदारांकडे पाठपुरावा करुनही दुर्लक्षच
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्र.2 मधील फेज-2 कामांसाठी निर्मलनगर ते वसंत टेकडीपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असतांना भगवानबाबा चौक, नित्यसेवा चौक या मुख्य रस्त्यामधील पाईपलाईनचे काम झाल्यावर अनेक ठिकाणी खड्डे बुजविले नाहीत. या भागातील माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे यांनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे इंजि.आर.जी.सातपुते तसेच ठेकेदाराकडे रस्ता कामासाठी चार महिने पाठपुरावा करुनही त्यांनी दुर्लक्षच केले. शेवटी वाहनचालकांना, नागरिकांना रोजचा हा त्रास होऊ नये म्हणून नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी मुरुम, माती आणून स्वत: टाकून हा मोठा खड्डा बुजावला.
नगर-औरंगाबाद रोड ते संत नामदेव चौक दरम्यान रस्त्यात वसंत टेकडीकडे पाईप लाईन टाकण्यात आल्या. मात्र त्यावर फक्त माती टाकून काम केले. या रस्त्यावर वाहतुक मोठ्या प्रमाणावर असल्याने आठ दिवसात 1 ते 2 फूट खोल खड्डा संपूर्ण रस्त्यात पडल्याने चारचाकी वाहने यामधून काढतांना फसत होती, दुचाकी वाहन चालकांना छोट्या अपघातास सामोरे जावे लागत. ही वस्तूस्थिती नगरसेवक सुनिल त्र्यंबके रोज संपर्क कार्यालय येथे असल्याने पाहत होते. चारही नगरसेवक संबंधित अधिकार्यांना रोज फोन करुन कल्पना देत होते, पण मनपा व ठेकेदाराने दुर्लक्षच केले.
त्यानंतर नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी स्वत: या खड्ड्यात मुरुम टाकून तो बुजवला. नगरसेवक स्वत: रस्त्याचेे काम करतांना पाहून येथील रहिवासी पुष्पा राऊत, देवीदास गुडा, योगेश पिंपळे, महेश बसोर, जावेेद शेख आदिंनी त्यांना भराव टाकण्यासाठी मदत केली. त्र्यंबके यांनी या खड्ड्यात स्व:खर्चाने मुरुम आणून टाकला. रोलर फिरविला तेव्हा रस्ता आता जाण्या-येण्यास चांगला झाला. या कामाबद्दल वाहन चालक व नागरिक यांनी त्यांना धन्यवाद दिले.
या भागातील अजूनही खड्डे, रस्ते दुरुस्तीचे काम बाकी असून, मनपा व ठेकेदाराने आठ दिवसांत खड्डे बुजविले नाही तर खड्ड्यात वृक्षारोपण करुन गांधीगिरी करुन हा प्रश्न सोडविण्यास चारही नगरसेवक भाग पाडतील, असे श्री.त्र्यंबके यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment