आता ग्रामीण भागातही सुरु झाली 'फिरत्यां'वर कारवाई
नगरी दवंडी / प्रतिनिधी
अहमदनगर : सध्या कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी कलम 144 अन्वये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्याच बरोबर विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये याबाबत वेळोवेळी आदेश देण्यात आले आहेत. मात्र काही लोकांना कोरोणाचे गांभीर्य अजूनही लक्षात येत नसल्याने नगर तालुक्यातील ग्रामीण भागात अशा विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची कोरोणा चाचणी करून त्यांना सक्तीने कोव्हीड केअर सेंटर मध्ये भरती करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानुसार एमआयडीसी, भिंगार आणि नगर ग्रामीण या तिन्ही पोलीस स्टेशनला आदेश देण्यात आले असून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची सक्तीने चाचणी करण्यात येत आहे. याअनुषंगाने नगर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत आरणगाव येथे वाळकी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ससाने यांच्या टीमने चाचणी करून पॉझिटिव्ह येणाऱ्या पेशंटना सक्तीने आरणगाव येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये दाखल केले. तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत अशा प्रकारच्या चाचण्या करून निंबळक येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये सक्तीने रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. अशाच प्रकारे भिंगार पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात नागरदेवळे आणि भिंगार बाजारतळ या भागात सुद्धा विनाकारण बाहेर फीरणाऱ्या व्यक्तींची चाचणी करून त्यांना बुरानगर येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये सक्तीने दाखल करण्यात येत आहे.
" नागरिकांनी विनाकारण कोणी बाहेर फिरू नये, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना सकाळी अकराच्या नंतर कोणत्याही परिस्थितीत चालू राहणार नाहीत अन्यथा दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल"
- उमेश पाटील, तहसीलदार अहमदनगर
No comments:
Post a Comment