इंधन, खत दरवाढ मागे घ्या.
राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देशात पेट्रोल व डिझेल इंधना च्या दरवाढीचा उच्चांक झालेला आहे. इंधन दरवाढीची झळ मध्यमवर्ग, चाकरमानी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना पोहोचली आहे. देशातील नागरिक एकीकडे कोरोना महामारी शी सामना करत असताना दुसरीकडे अशा परिस्थिती मध्ये केंद्र सरकार वारंवार महागाई मध्ये वाढ करून सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत करण्याचे काम करत आहे. इंधन व खतांची झालेली दरवाढ तातडीने कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल व होणार्या परिणामास केंद्र सरकार जबाबदार राहील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात महागाईच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात ते बोलत होते.
श्री. फाळके पुढे म्हणाले की, भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहे. शंभर रुपयांच्या वर पेट्रोलचे दर गेलेले असतानाच केंद्र सरकारने आज शेतकरी वर्गाला दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले. 10.26.26 ची किमती 600 रुपयांनी वाढली आहे. डीएपीची किंमत जवळपास 715 रुपयांनी वाढली आहे. जो डीएपी 1185 रुपये ला होता. तो आता 1900 रुपयांना मिळणार आहे.10.26.26 चे पन्नास किलोचे पोते 1175 रुपयांचे होते ते आता 1775 रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमतीही वाढविल्या आहेत. देशातल्या खतांची किमती प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप केंद्र सरकार करत आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत सापडलेला असताना खतांची दरवाढ करून केंद्र सरकारने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीमुळे महागाई वाढतच चाललेली आहे. याचा रोष विविध माध्यमांद्वारे व्यक्त केला जात असताना देखील केंद्र सरकार यावर कोणतेही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. म्हणूनच केंद्र सरकारच्या इंधन व खत दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर निषेध व निदर्शने करण्यात येत आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी राजेंद्र फाळके, अंबादास गारुडकर, प्रशांत गायकवाड, अशोकराव बाबर, किसनराव लोटके, सुहास कासार, केशवराव बेरड, सिताराम काकडे, आरिफ पटेल आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment